सुनीताबाई देशपांडेंनी जी ए कुलकर्णींना लिहिलेली पत्रे असे स्वरूप असलेले 'प्रिय जी ए' हे पुस्तक मागच्या आठवड्यात वाचले. त्यात त्या दोघांची राम-सीता-रामायण यावर झालेली एक छोटी चर्चा आहे. सुनीताबाई लिहितात, "राम म्हटल्यावर 'सीतेवर अन्याय करणारा इसम' एव्हढी एकच प्रतिमा मनात येते." मला ते एकदम पटले. माझ्याही मनात राम म्हटल्यावर आपल्या आदर्श प्रतिमेला (image) संभाळणारा, त्यासाठी 'वाट्टेल ते' करणारा _माणूस_ असेच येते.
आणि सीता म्हणजे सतत गृहित धरली गेलेली, दोषारोपांची सारी मापे पदरात घेणारी आणि अगदी असह्य झाल्यावर भूमीत गडप होणारी प्रातिनिधिक (typical ला मराठी शब्द?) स्त्री.
ती रामाचा, पर्यायाने रघुकुलाचा मानबिंदू आहे, म्हणून रावण तिला पळवतो, म्हणून राम तिला सोडवण्यासाठी युद्ध करतो. भारत देशाचा मानबिंदू म्हणून तिरंगा जसा महत्वाचा, तशी रामासाठी सीता त्याहून अधिक नाही असे वाटते.
मानसीने म्हटल्याप्रमाणे ती गुणवान खरीच, पण तरीही तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तिचा असा एकच निर्णय, शेवटाचा.
आणखी, हनुमानाबरोबर निघून येण्यामागे 'उद्धाराची आस' कशी ते मला कळले नाही. रावण काही वाईट राज्यकर्ता नव्हता. त्याची प्रजा त्याच्यावर खुश नव्हती असे कुठे वाचल्याचे स्मरत नाही. असे छुपेपणाने न येण्यामागचे कारणही 'मान' हेच असावे असे वाटते. जर हनुमान सीतेला घेऊन येता तर रामाची थोरवी ती काय राहीली?
बरे, लहानपणी शिवधनुष्याचा घोडा करणारी सीता, जिथल्यातिथे रावणाला अडवू का शकली नाही?
मला वाटते, वाल्मिकी व इतर पुरुष लेखकांनी त्यांना जशी आदर्श वाटते तशी सीता रंगवली आहे, एव्हढेच.