युरोपात वैज्ञानिकांना राजाश्रय किंवा धनाढ्य मंडळींचा पाठिंबा मिळाला. आपल्याकडे मात्र साहित्य, संगीत, कला यांनाच राजाश्रय मिळाला. विज्ञानाची कदर आपल्याकडे झालेली दिसत नाही. त्यामुळेच आर्यभट्ट, भास्कराचार्य यांच्या काळात गणित किंवा खगोल विज्ञानात असलेली प्रगती नंतर पुढे झाली नाही. ग्रहांचे बरे-वाईट परिणाम मानवी जीवनावर आणि माणसांवर होतात ही कल्पना वैदिक काळातही आपल्याकडे नव्हती. अलेक्झांडर आणि ग्रीकांमुळे ती आपल्याकडे आली.
विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झाली असली तरी आजच्या काळातही सुशिक्षित आणि उच्चशिक्षित मंडळी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवताना पाहायला मिळतात. त्यामुळे कधी कधी मी निराशही होतो. परंतु मुळात मी आशावादी माणूस आहे. या मंडळींना आपण बदलू शकत नसलो तरी लहान मुलांना आणि भावी पिढीला आपण विज्ञाननिष्ठ नक्कीच बनवू शकतो.
-डॉ. जयंत नारळीकर
संवाद नारळीकरांशी... ; बातमी (ठाणे वृत्तांत, लोकसत्ता, १ नोव्हेंबर २००५)