परवा मी पुण्यातल्या एका कॅसेटच्या दुकानात गेलो होतो. दुकानदाराने अतिशय आस्थेने मला हिंदीत विचारणा करून काय हवे आहे असे विचारले. मी शुद्ध मराठीत त्याला ध्वनिफितींची नावे सांगितल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला आणि त्याने माझ्यासमोर २-३ कॅसेट्स टाकून गणकयंत्र आणि ५-७ कागदांच्या कामात स्वतःला झोकून दिले. मी त्याला २-३ प्रश्न विचारले, त्याने मान ही वर न करता, अतिशय कोरड्या स्वरात उत्तरे दिली. तरीही मी त्याला "अजून काही अशाच कॅसेट्स आहेत का?" असे विचारले, त्याने पुन्हा मान वर न करता फक्त नकारार्थी हलवली आणि मी त्या दुकानातून बाहेर पडलो. असे अनुभव आता पुण्यासरख्या ठिकाणी खूप वेळा यायला लागले आहेत.
पुण्यात मराठी माणसाच्या दुकानात यापेक्षा जास्त आदरातिथ्य मिळणे म्हणजे पर्वणी आहे. त्यामुळे जरी तुम्ही अमराठी असाल तरी त्याने फारतर अजून एक-दोन वेळा लक्ष दिले असते आणि नंतर आपल्या कामात रमला असता. पुलंचे म्हणणे योग्य आहे, 'पुण्यात दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱ्हाईक!'. मुंबईत मला याउलट अनुभव जास्त आले आहेत. जर गिऱ्हाईक मराठी असेल तर मराठी दुकानदार जास्त आपुलकीने आदरातिथ्य करतो (याला कारण मुंबईतील स्पर्धाही असू शकेल.)
मराठी बोलण्याची आजकाल मराठी माणसाला लाज वाटते हे खरे. ऑफिसेस (संगणक क्षेत्रातील) सारख्या ठिकाणीदेखील २ मराठी कर्मचारी हिंदीत बोलणे पसंद करतात. मराठी बोलणे म्हणजे अगदीच गावरान प्रकार असे त्यांना वाटते. तेच दाक्षिणात्य लोकं बिनधास्त त्यांच्या भाषेत बोलतात आणि एकी टिकवून ठेवतात. त्यांना कुणीही नावे ठेवत नाहीत.
कर्मचाऱ्यांनी कचेरीत सर्वमान्य भाषेत बोलावे असा शिष्टाचार आहे. जर दाक्षिणात्य लोक तो पाळत नसतील तर त्यांना तशी समज दिली पाहिजे. लक्षात घ्या, हेच मराठी कर्मचारी काम संपल्यानंतर, किंवा कचेरीबाहेर मराठीमध्येच संवाद साधत असतील. दाक्षिणात्य लोक करतात म्हणून आपण ती चूक करणे कितपत योग्य आहे?
मराठी माणसामध्ये आक्रमकता, आत्मविश्वास आणि धाडस यांची कमतरता आहे म्हणून उत्तर भारतीय लोकं खुशाल इथे येऊन इथल्या मराठी लोकांवर वचक बसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात मुंबई सारख्या आणि कमी-अधिक प्रमाणात पुण्यासारख्या ठिकाणी यशस्वी देखील होतात. अशा वेळेस आपण शिष्टाचार वगैरे गोष्टींना थारा देत बसलो तर त्याला आपला कमकुवतपणा (जो की बऱ्याच अंशी असतो) समजून आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे लोक करतात.
ही कमतरता मराठी माणसामध्ये आहेच. त्याचा मराठी माणसाच्या शिष्टाचाराशी संबंध नाही. मराठी माणसाने आपले हे दोष मान्य करून त्यावर काही उपाय आहे का त्याचे संशोधन करावे, अन्यथा जे चालू आहे त्याचा स्वीकार करावा.
मी कॉलेजला असतांना कितीतरी मराठी विद्यार्थी असे होते ज्यांना मराठी मुलांच्या गटांपेक्षा अमराठी आणि त्यातल्या त्यात उत्तर भारतीयांच्या गटांत असणे म्हणजे खूप सन्मानाची बाब आहे असे वाटत असे आणि त्यासाठी त्यांची केविलवाणी धडपडही चालत असे.
फार वर्षांपूर्वी मी एकदा पुण्यात मराठी कॉपीरायटर च्या एका पदाच्या मुलाखतीसाठी गेलो होतो. ज्या महिलेने माझी मुलाखत घेतली ती शुद्ध पुणेरी मराठी महिला होती, पद ही मराठी कॉपीरायटर असे होते, काम सगळे मराठीतच असणार होते आणि तरीही त्या महान महिलेने माझी संपूर्ण मुलाखत इंग्रजीमध्ये घेतली. हा आचरटपणाचा कळस होता.
मी पूर्णपणे सहमत आहे. माझ्या मते महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतूनच कामकाज झाले पाहिजे. खाजगी क्षेत्रात(वर उल्लेखिल्याप्रमाणे संगणक क्षेत्रात) अशी सक्ती करणे तेवढेसे योग्य नाही.
मुळात या सगळ्या बाबींवर सामान्य मराठी माणूस विचार करायलाच तयार नाही. जोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टीची झळ पोहोचत नाही तोपर्यंत आणि त्यानंतरदेखील तोंडातून ब्र काढायचा नाही हे कातडीबचाऊ धोरण मराठी माणसाला महागात पडणार आहे. उगाच सभ्यतेच्या अतिटोकाच्या धारणा ज्या की सहसा मुखवटाम्हणून भ्याडपणा लपविण्यासाठी अंगिकारल्या जातात, त्या जरा बाजूला ठेवून प्रॅक्टीकल विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते.
मराठी माणूस कमालीचा प्रॅक्टिकल आहे म्हणून तर असा विचार करत नाही. तो स्वतःचा फायदा कशात आहे याचा विचार करून आपली वर्तणूक ठरवतो. मराठी माणसात एकी होणे हे तर बापजन्मी शक्य नाही. याचे कारणही तेच आहे. आपण केलेले मराठी माणसाचे वर्णन योग्य आहे.
हे माझे वैयक्तिक मत असून यातले बरेचसे दुर्गुण मराठी माणूस असल्यामुळे माझ्यातही असू शकतील. पण मी मराठी माणसाशी तो कुठेही असला तरी, त्याला आवडत नसले तरी मराठीतच बोलतो. सार्वजनिक ठिकाणी मराठीतच बोलतो आणि शक्यतो मराठी माणसाच्या दुकानातूनच (तो मराठी असल्यामुळे कितीही उध्दट आणि सौजन्यहीन असला तरी) जीवनावश्यक वस्तू विकत घेतो. असे करण्याला पर्याय आहे असे मला वाटत नाही.
आपला उपक्रम स्तुत्य आहे. आपण लोकांना बदलू शकत नाही. स्वतःमध्ये बदल घडवणेच योग्य आहे.
--ध्रुव.