आठवड्याचे सहा दिवस काम करून दमलेल्या कामगारांना रविवारच्या दिवशी शांतता हवी असते. अर्थात ही थोडी अतिशयोक्ती झाली. पण रविवार हा शांततेचा वार आहे असे मला तरी वाटते. सकाळी मनात आले तर आणि मनात आले की उठायचे. अंघोळ, दाढी, दंतमंजन आदि गोष्टींचा मन:पूर्वक तिरस्कार करायचा. लोळत पडायचे मनसोक्त - मस्तपैकी मराठी गाणी ऐकायची, नाही तर जुनी हिंदी गाणी. मग सौ मस्तपैकी फक्कड चहा करते, तो पीत तिच्या बरोबर गप्पा. मग एखाद्या मित्राचा फोन, दुपारी काय करताय विचारायला. मग त्यावर खलबतं - नक्की काय करायचं हे ठरे पर्यंत ११-१२ होतात. मग एकदम धावपळ - म्हणजे सुविद्य पत्नीची. आम्ही आपले सुलतानी थाटात. मग पडते तडी. घराबाहेर पडण्याची गडबड - एखादा पिक्चर किंवा कुठल्यातरी कॉफी हाउस मध्ये अड्डा. जेवण दुपारचे जरा टाइम पासच असतो.
मग वाटलं तर भाजी आणण्याचे (उच्च भाषेत सांगायचे तर weekend shopping) काम. पण ते मात्र दोघांनीच करायचे. रविवारी दोघांनाही सुट्टी, तेव्हा स्वयंपाकाला पण रजा. छानसे कुठे तरी जेवायला जायचे - बायकोला पण चांगला मूड असतो. एकंदरीतच दिवस छान, शांतपणे गेलेला असतो. हे रविवारचे असे क्षण जपून ठेवायचे असतात, इतर सहा दिवसांच्या धकाधकीच्या काळात आठवण्यासाठी, आणि त्यांच्याच आशेवर मधले सहा दिवस घालवण्यासाठी.