ओकप्रभृति 'तज्ज्ञां'च्या म्हणण्याप्रमाणे मुहंमद हा जर हिंदूच होता, आणि जर शिवभक्तसुद्धा होता (कारण - पुन्हा ओकादि 'तज्ज्ञां'च्याच म्हणण्याप्रमाणे - काबा हे जर शिवलिंग होते), तर मग मुहंमदाचे/मुहंमदी धर्माचे/मुहंमदाच्या अनुयायांचे आपणा हिंदूंशी (किंवा आपणा हिंदूंचे त्यांच्याशी) वाकडे असायचे कारणच नव्हते/नाही. आणि मुसलमान लोकांनाही आपली मंदिरे तोडण्याची काहीच गरज नव्हती. कारण वरील तर्काने ती त्यांचीसुद्धा मंदिरे होत. (कारण शेवटी तेही 'हिंदू'च आणि आपणही हिंदूच!)

आणि मग त्याच न्यायाने, ताजमहाल काय किंवा तेजोमहालय काय, दोन्ही त्यांची (आणि तर्काने आपलीसुद्धा) 'मंदिरे'च नव्हेत काय? शेवटी एका हिंदू भक्ताने बांधलेले मंदिर आणि दुसऱ्या 'हिंदू' भक्ताने बांधलेले 'मंदिर'(/कबर/मशीद) यांच्यात फरक तो काय करायचा?

आणि मशिदी म्हणजे सुद्धा शिवमंदिरेच असावीत बहुधा! (कारण मुहंमद हा जर शिवभक्त, तर मग मुहंमदप्रणीत प्रार्थनामंदिरे म्हणजे शिवमंदिरेच की! वा! काय सुंदर कल्पना आहे!)

म्हणजे मग पर्यायाने अयोध्याप्रकरण म्हणजेसुद्धा रामभक्त आणि 'शिव'भक्त यांच्यातील (म्हणजे 'हिंदु''बांधवां'मधील) वाद समजावा का? तसे असेल तर मग एवढ्या मारामारीचे प्रयोजन मज अल्पमतीस कळले नाही.

आणि (येशू) ख्रिस्तसुद्धा (यशोदेचा?) कृष्ण होता म्हणे. मग तर... जाऊदे, याला अंत नाही.

खरंच, धन्य ते 'संशोधन'!

- टग्या.

वरील सर्व हे उपरोधाने लिहिले आहे. (वास्तविक हे वाक्य लिहिण्याची गरज नसावी, परंतु येथे क्वचित्प्रसंगी उघडउघड उपरोधसुद्धा काहींच्या लक्षात येत नाही, असे दृष्टीस आल्याने असे लिहिणे प्राप्त आहे.)