तुमच्यापैकी अनेकांनी जी एंच्या कथांचा आणि भाषांतरांचा उल्लेख केलेला पाहून "माझिया जातिचे" इतके लोक पाहून आनंद झाला. माणसाच्या आयुष्याबद्दल आपल्या कथांमधून त्यांनी जो काव्यात्म, चिरंतन असा आलेख माण्डलेला आहे, त्याला मराठीत तरी तोड नाही. ग. प्र. प्रधान, हातकणंगलेकर, माधव आचवल, रा. ग. जाधव, द.भि.कुलकर्णी, धों.वि. देशपांडे अशा दिग्गजांनी अनेकविध अंगानी त्यांच्या बहुआयामी,शाश्वत सत्याचा वेध घेणाऱ्या प्रतिभेचे समीक्षण केलेले आहे. आणि बहुतेक सर्वांनी सर्व सांगून "जी ए दशांगुळे उरतातच" असे मत नोंदविले आहे...

जी एंच्या प्रतिभाधर्माशी नाते सांगेल असे लेखन करणारी लेखिका गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्यात प्रकाशमान झाली आहे; ती म्हणजे मेघना पेठे; असे मला वाटते. इथे कुणी त्यांचे लिखाण वाचले आहे का? तुमच्यापैकी कुणाला या २ लेखकांच्या लेखनधर्मात (मला जाणवला तसा) समान धागा दिसला का ?