मंगळसूत्र हा स्रीचा खरच एक अधिकार आहे.... एक पत्नी होण्यासाठी, सून होण्यासाठी, भविष्यात पुढे माता होण्यासाठी
मंगळसूत्र घालावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न तर आहेच तसेच विवाहित असूनही ते न घातले जाण्यामागे एक निश्चित वैचारिक बैठक ही आहे. पत्नी होण्यासाठी, माता होण्यासाठी, सून होण्यासाठी जर मंगळसूत्र हा अधिकार असेल तर असा अधिकार पती होण्यासाठी, पिता होण्यासाठी, जावई होण्यासाठी पुरुषाला अनावश्यक कसा ठरतो? त्यामुळे हा अधिकार- बिधिकार काही नाही, केवळ ही स्त्री आता एका कुणाच्या तरी मालकीची झाली याचे चिह्न आहे म्हणून ते नाकारले जावे हा तो विचार! अर्थात हा विचारही आता इतका जुना झाला आहे की मंगळसूत्र घालणे किंवा न घालणे हे दोन्ही सारखेच बिन महत्वाचे झाले आहे. विवाह-विधी नंतरची मंगळसूत्राची अनिवार्यता वैधव्यातही एखादी स्त्री केवळ सामाजिक सुरक्षिततेसाठी पाळू इच्छिते तेंव्हाच समजून येते की हा अधिकार आहे की आणखी काही? समाजातील वाईट नजरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विधवांनीही मंगळसूत्र का घालू नये असा विचार एक वेळ समजू शकतो. पण दिमाखाने मिरवण्यासारखे त्यात काय आहे हे समजत नाही. उलट यात आपल्या समाजाची हारच आहे असे वाटते. आवड म्हणून, दागिना म्हणून, नाइलाज म्हणून, संरक्षण म्हणून ते घातले जाते तसेच ते आवडत नाही, पटत नाही, गरज नाही म्हणून नाकारलेही जाते. आपल्याला दोन्ही विचारसरणींचा आदर करायला हवा असे मला वाटते.
छाया