(रत्नाकर मतकरींची हि कथा. आता जितकी आठवते तितकी सांगते.)
दुपारची वेळ होती. एका पंगतीत रिकामी पाने मांडली होती. आणि बायका,माणसे,मुले पानावर बसली होती. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. इतक्यात बाहेरुन उन्हातून एक अशक्त माणूस अडखळत कसाबसा आत आला आणि 'मला काहीतरी खायला द्या.मला भूक लागली आहे' इतकेच उद्गार कसेबसे काढून खाली पडला. यजमानाने त्याला उठवले आणि एका आसनावर बसवले आणि पाणी दिले. यजमानाने विचारले, 'तुम्ही बर्याच दिवसाचे उपाशी दिसता आणि चिंतातुर.काय झाले आम्हाला सांगाल का?'
अशक्त पाहुणा पाणी पिऊन थोडा हुशारला, आणि आपली कहाणी सांगू लागला:
"मी एक प्रवासी.या गावातून त्या गावात भटकत असताना असाच शेजारच्या गावातल्या एका धर्मशाळेत उतरलो.एक दिवस तिथे जेवत असताना एक म्हातारी बाई येऊन म्हणाली,
'या धर्मशाळेत चांगले मांस मिळत नाही.तुला ताजे मांस हवे आहे का?'
मी खवैया असल्याने 'हो' म्हणालो.
ती म्हणाली, 'तुला त्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार नाहीत पण तुला माझ्याबरोबर एका पूजेत भाग घ्यावा लागेल.'
मी कुतुहलाने विचार केला, 'बघुया तरी, काय पूजा, आणि हि रोज फुकट ताजे मांस किती दिवस आणून देते ते.'
म्हणून मी तिच्याबरोबर गेलो. गावाबाहेर एका अंधार्या झोपडीपाशी ती थांबली.आणि मग आत नेऊन तिने मला एक पेय प्यायला दिले. ते प्यायल्यावर मला जरा चक्कर आल्यासारखे वाटले.मी ५-६ मिनीटेच भिंतीला टेकून बसलो. जेव्हा मला जाग आली तेव्हा ती म्हणाली,
'पूजा झाली.आता तू धर्मशाळेत परत जा. मांस मी तिथल्या आचार्याशी बोलून तुला शिजवूनच देत जाईन रोज.'
मी परत गेलो धर्मशाळेत. पण माझे डोके दुखत होते. आरशात पाहिले तर कपाळावर एक टिळ्यासारखा लाल डाग होता. पण तो पुसून गेला नाही. ती जखम होती. मी दुर्लक्ष केले. दुसर्या दिवशी त्या म्हातारीने कबूल केल्याप्रमाणे चवदार जेवण दिले.
माझी भूक अचानक खूप वाढली होती. आधीपेक्षा दुप्पट खात होतो मी. असेच ३-४ दिवसाने मी जेवणाच्या वेळी मी सहज म्हातारीला विचारले,
'मांस रुचकर आहे. पण मला अजून चव नीट कळली नाही. कोणत्या प्राण्याचे मांस आहे हे?'
म्हातारी गूढ हसत म्हणाली,
'तू धर्मशाळेत चालणार्या गप्पा ऐकल्यास का काल आणि आज?काल शाळेतून घरी परतणारा ७ वर्षाचा मुलगा घरी परत आलाच नाही. त्याचा शोध चालू आहे. परवा एका घरातून एका बाईचे १ वर्षाचे मूल कोणीतरी पळवले.'
मी हादरलो. मला माझीच किळस वाटली.
मी म्हणालो, 'आजपासून मला काही नको. निघून जा आणि परत माझ्याशी बोलायलाही येऊ नकोस.'
म्हातारी अजिबात अस्वस्थ झाली नाही. ती म्हणाली,
'तू आता असा माघार नाही घेऊ शकणार.तू माझ्याशी रक्ताचा करार केला आहेस स्वखुशीने. आता तुला ते मांस खावेच लागेल.तुझी भूक पण वाढली आहे. साधे खाणे आता तुला खाववणार नाही.आणि जर तू मांस खाल्ले नाहीस तर तुलाच आता आमच्यापैकी कोणाचे तरी खाद्य बनावे लागेल.'
तिच्या शब्दाने माझा राग वाढतच गेला. मी तिच्या अंगावर ओरडलो,
'चेटकिणी, निघून जा!!मला तुझ्या मांसाची गरज कधीच पडणार नाही.'
पण त्याच रात्री मला कडकडून भूक लागली. पोटात आगडोंब उठत होता. धर्मशाळेच्या खानावळीत खायचा प्रयत्न केला, पण मला ते खाणे आवडत नव्हते. भूक पेटतच चालली होती. पण समोर असलेले खाणे आवडत नव्हते.आणि म्हातारीचे शब्द सारखे आठवत होते. शेवटी मी रातोरात धर्मशाळा सोडली आणि चालत राहिलो. रात्री देवळात झोपलो. भूक वाढतच होती. सकाळी उठून परत खूप चाललो आणि आता इथे आलो आहे. मला तुमच्या पंगतीत जेऊ द्या, मी भुकेने अर्धमेला झालो आहे."
यजमान म्हणाले, 'ठिक आहे. आपण भोजनाला प्रारंभ करु.'
आणि यजमान पंगतीला म्हणाले, 'पंगतीने भोजनाला आरंभ करावा.'
आणि.........................
त्या आधीच भुकेल्या पंगतीतली सर्व पिशाच्चे पाहुण्यावर तुटून पडली!!!!
ता.क.:प्रभाकर,तुमचा अभिप्राय वाचला. मला सुदैवाने अनुभव कधी आले नाहीत..त्यामुळे वाचलेल्या कथांवर समाधान मानावे लागते. तुमच्या २-३ अनुभवांची प्रतिक्षा आणि स्वागत आहे...आणि इतर मनोगतींच्याही..काढा बाहेर गपाटप्पातली भूते!!!मी वाट पहात आहे.