महाभारतातल्या पात्रांचा आवाका इतका प्रचंड आहे की, त्या पात्रांचे व्यक्तिगत विश्लेषण चर्चेत येथे मनोगतावर आणल्यास एक महाप्रचंड ग्रंथाची निर्मिती होईल ! 

थोडक्यात माझी मते येथे देतो...

विदुर कुरू कसा?- ह्याला कुरू समजणेच चुकीचे आहे. पण विदुराबद्दल पंडू व धृतराष्ट्राला वाटणारे ममत्वाचे कारण म्हणजे तो त्यांचा सावत्र भाऊ असण्याची संभावना. ज्या नियोग पद्धतीने धृतराष्ट्र व पंडू जन्माला आले होते त्याच पद्धतीने विदुर जन्माला आला फरक इतकाच की, तो दासीच्या बरोबर केलेल्या नियोगाचे फळ होते. तसे बघायला गेल्यास भीष्म हेच शेवटचे कौरव असल्याचे बहुतांश मत आहे. इतरांना त्यांचे वंशज म्हणणेच चुकीचे आहे.

उदाः-  "सावत्र मावस भाऊ"/"सावत्र आत्ये भाऊ" ह्या नात्याची एक व्याख्या अशीही करता येईल-
आईच्या/वडिलांच्या बहिणीचा (मावशीचा/आत्याचा) अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या यजमानांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीला आपण मावशी/आत्या मानतोच ना ? पण खरोखर ती आईची/वडिलांची सख्खी बहीण असते का ? (सख्खी सोडा, सावत्र वा मानलेली बहीणही नसते !)  मग ह्या नवीन लग्नापासून झालेले अपत्य आपले सावत्र मावस/आत्ये भावंड कसे होईल ? तरीही नात्याचा आपण सन्मानाने "सावत्र मावस/आत्ये भाऊ" असाच उल्लेख करतो ना ? विदुराचे प्रकरण काहीसे तसेच असावे.

लाक्षागृहात खून- लाक्षागृहात सापडलेली प्रेते ही जळण्यापूर्वीच मृत व्यक्ती होत्या. त्यामुळे त्यांच्या खुनाचा प्रश्नच उद्भवत नाही.

कर्णास अंगराजपद- कर्णाचे अंगराज पद तसे बघितल्यास ज्येष्ठ कौरवांना व पांडवांनाही रुचलेले नव्हतेच परंतु आपण उगीच त्यावर आक्षेप घेतल्यास शीघ्रकोपी दुर्योधनाला अकांडतांडव करण्यास वाव मिळेल हा विचार त्यांनी केला असावा. असेही धनुर्धारी पार्थासमोर कर्णाचा निभाव लागणार नाही  हा (अती ?) आत्मविश्वासही त्यांना होताच.

जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का?- अभिमन्यूला फक्त कपटानेच मारले गेले नव्हते तर त्याच्या कलेवराचेही धिंडवडे काढण्यात आल्याचे काही ठिकाणी वाचल्याचे स्मरते कदाचित अर्जुनाने त्यासाठीच इतकी उग्र प्रतिज्ञा केली असावी.

अर्जुनाच्या priorities- युद्धात डिवचून बोलल्याने आत्मसन्मान वृद्धींगत होत असावा. आजही सेनेतले जवान भारी भक्कम शिव्या देतात ह्या मागचे कारण हेच असावे का ? काही वेळा रेल्वेचे कर्मचारी किंवा टेलिफोन चे कर्मचारी केबल्स वा रेल्वेरुळ खेचताना आपण बघितल्यास, ते एकत्र शिव्या देत असतात- ह्या मागचे मानसशास्त्र काय असावे हा खरोखर विचार करण्यालायक विषय आहे !  

महाभारतातल्या पात्रांचा अभ्यास हा खरोखर एक इंटरेस्टिंग विषय आहे-