आपण १९४७ नंतरच्या भारताबद्दल बोलत आहात अशी माझी धारणा आहे.म्हणजेच भारतीय घटनेनुसार आपण ज्याला "भारतीय प्रजासत्ताक म्हणतात अशा आपल्या देशाबद्दल बोलत आहात". थोडक्यात आपण घटनेनुसार आपल्या देशाच्या नागरिकांना परक्या देशात जायला सांगत आहात. त्या घटनेनुसार भारत जितका आपला तितकाच भारताच्या सर्व नागरिकांचा म्हणजेच इस्लाम मानणाऱ्यांचा सुद्धा, हे खरे नव्हे का? शिवाय जर आपण स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल बोलत आहोत तर परकीय देशात हिंदूंची स्थिती कशी हा धार्मिक प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्या देशाशी निगडित नाही. हा प्रश्न आपणास देशाशी निगडित वाटत असेल तर आज अमेरिका, युरोप मध्ये मुसलमानांची परिस्थिती कशी याबद्दल आपण कासावीस होताना दिसत नाही. येथे भारतीय नागरिक हे हिंदू व मुसलमान दोन्ही असल्याने प्रश्न देशाशी निगडित असेल तर दोहोंना लागू होईल अशी भावना.
दुसरा मुद्दा लाखो हिंदू देशोधडीला लागल्याचा. जेव्हा हे देश विभक्त झाले तेंव्हा जे घडले ते घृणास्पद आहे. परंतु हे दोन देश मिळून जो देश असत असे त्यावर दोन्ही देशातील लोकांचा सारखाच अधिकार होत हे विसरू नये. भारताचा तुकडा पाकिस्तान असे समजण्यापेक्षा स्वातंत्र्यपूर्व भारताचे दोन विभाग - भारतीय प्रजासत्ताक व पाकिस्तान हे जास्त योग्य नव्हे का? ( नंतर पाकिस्तान चे आपण अजून दोन तुकडे केले हा भाग वेगळा)
आज आपले (हिंदू) लोक जगभर आहेत व आपली संस्कृती जपत आहेत. आपण अभिमानाने सकाळ मध्ये कॅलिफोर्नियात गणेशोत्सव साजरा झाल्याचे वाचतो. दुसऱ्या देशांनीही आपण म्हणता त्याप्रमाणे हिंदूंना भारतात परत जा सांगितलेले आपणास रुचेल काय?
थोडक्यात स्वातंत्र्योत्तर भारत आपणा सर्वांचा आहे. आणि परकीय देशात काय चालते हा मुद्दा येथे "ईररेलेव्हंट" आहे (शब्द सुचवावा) तेव्हा माझ्या भारताच्या नावाखाली माझ्या भारतीय बांधवांना परदेशी हाकलू नका.
मनकवडा