माझ्यामते "रामाने सीतेला वनवासात पाठवले" हा मुख्य भाग नसून, "रामाने परिटासारख्या सामान्य नागरिकाचे म्हणणेही दुर्लक्षिले नाही" हा महत्त्वाचा भाग आहे.
राम हा शास्ता होता. नुसताच राजा नाही तर आदर्श राजा होता. आदर्श राजाची काही कर्तव्ये असतात. त्यानुसार, प्रत्येक प्रजाजनाच्या शंकेचे निरसन करणे हे राजाचे कर्तव्य असते. त्यानुसार, जर जनतेच्या मनात राज्याच्या राणीबद्दलच शंका आहेत तर त्यांचे योग्य परिमार्जन करणे हे राजाचे कर्तव्य होते. त्यानुसार तो वागला.
कधी कधी आदर्शांची हीच गोची असते. राजाला सामान्य माणसांने घालून दिलेल्या आदर्शांनुसार वागता येत नाही. त्याला राजाचेच आदर्श पाळावे लागतात. इथे रामाने त्याग केला तो राज्याच्या राणीचा, स्वतःच्या बायकोचा नव्हे.
ह्यानंतरही रामाच्या भुमिकेचे मोठेपण दाखवताना, रामही आपल्या महालात जमिनीवर झोपत होता, त्याने दुसरे लग्न केले नाही ( त्यावेळेस ती प्रथाच होती, तरीसुद्धा! ) हे आपल्याला दिसतेच.
उत्तम शोकांतिका ह्यालाच म्हणत असावेत. रामापुढे दोनच पर्याय होते. राजा म्हणून वागायचे, अथवा सीतेचा पती म्हणून वागायचे. ( तिसरा पर्याय, जो दोन्हींना सामावून घेऊ शकतो, तो उपलब्ध नव्हता. कुणाला माहिती असल्यास सांगावा. ) दोन्हीपैकी कोणताही पर्याय अवलंबला असता तरी दुसऱ्यावर अन्याय होणारच होता.
राजावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते, त्यादृष्टीने सीतेचा पती राम यापेक्षा अयोध्येचा राजा राम, ह्याची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे राजाच्या आदर्शांना प्राधान्य मिळाले. त्यातून सीतेवर अन्याय झाला. ( सीतेला न्याय मिळाल्याचे खुद्द रामायणकार वाल्मिकीही म्हणत नाहीत. म्हणूनच व्यथित सीता पुन्हा आपल्या मातेकडे जाते! )
राजाची भूमिका निभावताना, रामाने व्यक्तिगत आयुष्यातील सुखांचा त्याग केला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच वियोगाचे दुःख सोसावे लागले. रामाच्या ह्याच निर्णयामुळे त्याला स्वतःची मुले कित्येक वर्षे भेटली नव्हती.
रामायणातल्या ह्या गोष्टीत स्त्री-पुरुष समानता, स्त्रीवर अन्याय , असे मुद्दे आणणे चूक आहे असे वाटते. बरेच स्त्रीमुक्तीवाले ह्या गोष्टीमुळे रामाला मोठेपण द्यायला तयार नसतात. एकेकाची विचार करण्याची पद्धत असते. पण मला तर वाटते की ह्याच गोष्टीमुळे राम हा एक आदर्श राजा होता हे फार ठाशीव पद्धतीने सिद्ध होते.
नाहीतर क्षुल्लक कारणावरून पत्नीला किंवा पतीला घटस्फोट देऊन व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्यांची संख्या कमी नाही. व्यक्तीस्वातंत्र्याला माझी ना नाही. पण जिथे समाजाची आधी व्यक्ती येते तो समाज विखुरला जातो असे वाटते. रामायणासारख्या आदर्शांची गरज म्हणूनच समाजाला कायम असते. व्यक्तीपेक्षा समाज किंवा समाजहित केंव्हाही मोठे, हे त्यातून आपल्याला शिकायला मिळते. अर्थात, शिकण्याची इच्छा असेल तर. नाहीतर सूर्य पूर्वेला उगवतो, यावरही बुद्धीभेद करता येईल.
मला यात एक फार मजेशीर दुवा सापडतो. म्हणजे असे की रामायण कुणी लिहिले? तर पूर्वाश्रमीच्या वाल्याकोळ्याने. तो वाल्मिकी कसा झाला? तर त्याच्या बायकोनेच त्याच्या पापात सहभागी व्हायला नकार दिला, तेंव्हा त्याच्यात परिवर्तन झाले.
पुढे हाच वाल्मिकी रामायण लिहिताना कुटुंबप्रमुखाच्या एका निर्णयाचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगायला लावतो. आहे की नाही मजा? साहित्यातली उत्तम समज असणाऱ्यांनी ह्यातला दुवा आणिक खोलवर शोधला तर मजा येईल.