वर नमूद न झालेल्या एका गोष्टिचा म्हणजे, "माणूस" असल्याबद्दल जाम अभिमान वगैरे वाटायचा बुवा. तसा या "जातीत" आपल्याला फुकटच प्रवेश मिळाला पण खालील कारणांस्तव अभिमानच वाटायचा --
आपण डास नाही त्यामुळे कोणितरी फटक्यात आपल्याला गारद करणार नाही.
आपण कोंबडी नाही म्हणजे कोणीतरी आपल्याला मिटक्या मारत खाणार नाही. (तुमच्यावर हल्लाबोल नाही हं तेव्हा हलकेच घ्या)
आपण बैलोबा नाही त्यामुळे आपल्याला कोणी घाण्याला जुंपणार नाही.
आपण वाघ नाही त्यामुळे आपल्याला कोणी पिंजऱ्यात कोंडणार नाही.
अशी एकेकाळी अस्मादिकांची खुळी समजूत होती. नंतर हळूहळू कळल की आपण कधीतरी या सर्व भूमिकाही वठवतो.
त्यातून नैसर्गिक आपत्तींमधे हकनाक मरणारी डासांसारखी माणसं पाहिली, तंदूर मधे कोंबडीसारख्या जळणाऱ्या स्त्रीबद्दल वाचलं, ऑफ शोरच्या नावाखाली २४ तास काम करणारी बैलासारखी माणसं पाहिली, असमानता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी सर्वांमुळे कोंडी होऊन गेलेला पींजऱ्यातल्या वाघासारखा समाज पाहिला आणि अभिमान गळून पडला.
नाही तसा कधी कधी उफाळून वर येतो आणि मला वाटत वृथा असला तरी मनाला सुखावतो. (हा मुद्दा आधी व्यक्त करायला वेळ नव्हता आता करते)
अभिमान उफाळून येतो बाबा आमटे, गांधीजी, मदर तेरेसा, MLK यांच्यासारखी माणसं पाहिली की. वाद बाजूला ठेवले तर त्यांनी जन्माला येऊन काहीतरी वेगळे करुन दाखवले म्हणून.
अभिमान उफाळून येतो राजा राम मोहन रॉय सारख्या प्रभृतींविषयी वाचलं की..कारण त्यांनी अनिष्ट प्रथांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला.
अभिमान उफाळून येतो सीमेवर देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांमुळे...कारण त्यांच्या जीवावर आम्ही स्वातंत्र्य उपभोगतो.
अभिमान उफाळून येतो माझ्या स्वतंत्र देशाचा झेंडा डौलात फडकताना पाहिला की आणि त्या स्वातंत्र्यात आपल्या जीवनाची होळी करणाऱ्या अनेक वीरांचा.
आणि अशा अनेक "माणसांचा" ....यांत अस्मादिकांचा सहभाग शून्य त्यामुळे वृथा म्हणा पण प्रत्येकवेळी माणूस असल्याबद्दल अभिमान वाटतो.