देशाने सामना जिंकावा वाटणे यात अभिमान आहे की प्रेम/आपुलकी? जर तो असाच आनंद पाकिस्तानने सामना जिंकल्यावर पाकिस्तानी नागरिकाला ही होत असेल हे समजू शकत असेल तर ही निव्वळ आपुलकी आहे. (तो बुकी असेल, त्याचा विजयात हातभार लागत असेल तर अभिमान वाटणे गैर नाही.)

कल्पना चावला भारतीय यानातून अंतराळात प्रवास करत असत्या तर, या कल्पनेने काहिशी खिन्नता आली, बरोबरच कौतुक वाटले. पण त्यांच्या यशात त्याला अभिमान वाटणे अपेक्षित असलेल्या देशांच्या तांत्रिक क्षमतेचा नसलेला सहभाग पाहून अभिमानांच्या संकल्पनेत द्वंद्व होऊन निव्वळ कौतुक उरले. (अभिमान कशाला म्हणतात, ते तिच्याच महाविद्यालयात, (काही वर्षे नंतर!) शिकलेल्या त्याच्या मित्राला विचारा, तो तुम्हाला पहिल्या-दुसऱ्या मुलाखतीतच ही बाब सांगेल, जणू याने तिला काही गणिते सोडवायला मदत केली होती. :D)

आपल्या मुलाला अधिक गुण मिळाले म्हणून आनंद वाटला यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. पण काही विशेष कर्तृत्व न दाखवलेल्या मुलाने निव्वळ माझा असल्याच्या कारणापोटी, अभिमान सुखावण्यासाठी केलेले कौतुक नक्कीच खुपते.

त्याच्या भाषेतील आद्यकवी, म्हणून ज्ञानेश्वरांनी मांडलेला प्रत्येक विचार, भाषेच्या अभिमानाने त्याने मानणे चुकीचे ठरेल. अमृताशी पैजा जिंकणे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे हे माहीत नसणे, बंगाली, पंजाबी, फ्रेंच गोड वाटतात, इतर अनेक भाषा अजून ऐकलेल्याही नाहीत एवढी माहिती, त्याला मराठी अमृताहून मधूर असल्याचा दावा करण्यापासून परावृत्त करायला पुरेशी आहे.