हिमेश रेशमियावरून चाललेल्या चर्चेत मुळातच ज्यालेखावरून हि चर्चा सुरू करण्यात आली, तो लेखच गायब आहे. संपूर्ण चर्चा, ह्या व्यक्तीवरील आकसाभोवतीच फिरते आहे. पण काही गोष्टी संपूर्णपणे दुर्लक्षिल्या गेल्या आहेत.

मुळात, हिमेशचे संगीत व्यावसायिक आहे. जे लोकांना आवडते तेच दिले जाते, कधीकधी काहीसे संगीत हे लादलेही जाते. अश्या संगीतापासून जास्त काही अपेक्षाच ठेवू नयेत. भारतात संगीताचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मूळचे भारतीय संगीत, त्यात आपले शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीता सारखे प्रकार येतात. आणि दुसरे म्हणजे, चित्रपटसंगीत आणि आजकालचे "अल्बम्स". ह्यातील, आपले जे खरे मूळ संगीत आहे, त्याबद्दल आपले ज्ञान "अगाध" असते. ते सामान्य माणसाला समजायला कठीण आणि बरेचदा "कंटाळवाणे" असच असते. मग उरत चित्रपट संगीत. सुरुवातीच्या काळात, चित्रपट संगीतावर शास्त्रीय संगीताचा बऱ्यापैकी पगडा होता. त्याचे व्यावसायीकरण सर्व प्रथम केले गेले ते ( मान्य करा अगर नको ) ते शंकर-जयकिशन ह्या जोडगोळीने. काहीही आवश्यकता नसताना, १०० जणांचा ऑर्केस्ट्रा ह्यांनीच भारतात आणला. त्यांची गाणी जरी "रागां"वर आधारीत वगैरे असलीत तरी संगीत भारतीय अजिबात नव्हते. त्यांनीच वर आणलेला मुकेश, हा नाकातूनच गायचा. पण, ह्या संगीताला, अभिजात संगीत म्हणून डोक्यावर घेतले गेले आणि इथूनच खरी संगीताच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. ज्याकाळी, पाश्चात्य जगतात, सिंफ़नी-ऑकेस्ट्रा गाजत होते. आणल्याकडे शंकर-जयकिशन राज्य करीत होते. त्यानंतर तिथे रॉक-अँड-रोल आलं, आपल्याकडे आर. डी उदयाला आले, त्यांनाही डोक्यावर घेतले गेले. मग पुढे, तिथे डिस्को आला, आपण, बप्पीला उचलून धरले, आता ९० नंतर तिथे, हिप-हॉप आणि रेगे ने जम धरला आपल्या कडे घरी बसून संगीत निर्मिती करणारा रेहमान आला. आपल्या चित्रपटसंगीताच सर्वच प्रवास हा पाश्चात्य संगीतावरच आधारीत होता, आणि आजही आहे आणि पुढेही असणारच आहे. कारण, जे आपले स्वतःचे संगीत आहे, ते आपल्याला कळतच नाही किंवा कंटाळवाणे तरी वाटते.

त्यातून, जुने संगीत फार अजरामर होते म्हणून ते टिकले असा दावाही मला मान्य नाही. एकतर त्याकाळी फारशी स्पर्धा नव्हती, आजच्या इतके चॅनलही नव्हते आणि ज्यांनी चित्रपट व्यवसायात जम बसवला होता ते इतरांनाही सहसा वर येऊ देत नसत. त्यांमुळे एकाच प्रकारच्या संगीताची छाप बरेच काळ कायम राहिली, कारण, "ऑप्शन्स" फारसे नव्हते. त्यामानाने आज नवीन गुणांना भरपूर वाव आहे. त्यामुळेच दररोज नवीन गायक जन्माला येतात, एक जण जम धरू लागायच्या आत, दुसरा निर्माण होतो. आज, हिमेश आहे, उद्या नसेल ह्याला कारण त्याचे संगीत निकृष्ट आहे असे नाही आणि जुने संगीत फार काळ टिकले कारण ते फारच उच्च दर्जाचे अभिजात संगीत होते असेही नाही. चोऱ्या सुरुवातीपासूनच चालू होत्या. जुनं संगीत ऐकणारी पिठी संपली की जुने संगीतही संपेल. आणि नवीन कोणीच संगीत विश्वावर अधिराज्य वगैरे गाजवणार नाही कारण लोकांकडे भरपूर "चॉइस" असेल.

ज्यांनी ह्या सर्वप्रकाराला सुरुवात केली, ते, आणि ज्यांनी ह्यासर्वप्रकार त्या काळी डोक्यावर घेतला ते, ह्या दोधांनाही हिमेशला शिव्या घालण्याचा काहीही अधिकार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. फार आधी सुरू झालेल्या एका व्यवसायाच हिमेश तर फारच लहान खेळाडू आहे. फार आधीच शंकर जयकिशन नाकारले असते आणि आज हिरेनच्या नावाने बोट मोडणाऱ्या पिठीने आपल्या मुलांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले असते, तर हिमेश जन्मालाच नसता आला.

मयुरेश वैद्य.