जर १०० जणांचा चमू भारतीय चित्रपटसंगीतात शं-ज ने नाही आणला तर नक्की कोणी आणला ? मला त्यांचे संगीत कर्कश वाटते ह्याला कारणही तसेच आहे. ते कारण, ज्यापद्धतीने  शं-ज नी हिंदीमध्ये ऑकेस्ट्रा वापराला, आणि ज्यापध्दतीने पाश्चात्य संगीतात तो वापरला जातो त्यातल्या फरकात आहे. शं-ज ह्याची ऑकेस्ट्रा वापरायची पद्धत माझ्यामते तरी अतिशय "भडक" किंवा ज्याला आपण "लाऊड" म्हणू शकतो अशीच होती.

मुकेश ह्या गायकास, राज कपूर आणि शं-ज ह्यांनी उचलले नसते तर, तो इतका वर आलाच नसता. त्यापुढे, ब्रेक देणं आणि वर आणणे, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत नाही का ?

आर. डी. ने रॉक लोकप्रिय केले हे खरे, पण आर. डी. कधीच टाईपकास्ट झाला नाही.
अशी स्वतःच्या शैलीपासून "हटके" गाणी सर्वांनीच दिली आहेत. अगदी बप्पीची "माजिले अपनी जगह" अजिबात "डिस्को" नव्हती.

मयूरेशजी, हे अक्षम्य वाक्य आहे. आपले (भारतीय) संगीत फारफारतर तुम्हाला कळत नाही किंवा कंटाळवाणे वाटते, असे म्हणा!
हे तुम्ही माझ्याबद्दलचे मत नक्की कोणत्या आधारावर बनविले आहे ह्याची मला कल्पना नाही. असो. लेखाच्या सुरुवातीलाच मी संगीताची २ विभागात विभागणी केली आहे, आणि त्यातल्या चित्रपटसंगीत आणि व्यावसायीक संगीत ह्या दोनच प्रकारच्या संगीताबद्दल माझे मत मी मांडतोय. त्यातून कोणाचेही संगीत टुकार-टाकाऊ होते असेही मी म्हणालो नाहीये. त्यातून माझे ते वाक्य चुकीचे कसे काय ? बहुतांश भारतीयांना शास्त्रीय संगीत समजते काय ? जर त्यांना ते समजत असते, तर ते भारतीय चित्रपटात का बरे तसे च्या तसे वापरले गेले नाही ? का आपले चित्रपटसंगीत नेहमीच पाश्चात्य जगतात होणाऱ्या बदलांनुसार बदलत गेले ? आणि अगदी नवीन वाद्ये/ऑकेस्ट्रा भारतात आणले गेले तर त्याचा उपयोग भारतीय शास्त्रीय संगीताला कित्ती झाला ? 

बाकी बऱ्याच मुद्द्यांचा तात्यांनी समाचार घेतलेलाच आहे.
नक्की काय समाचार घेतला ? काही ओळी उचलल्यात, त्यांना, असहमत, पूर्णतः असहमत असच काही त्यांनी लिहिलंय. का असहमत ते त्यांनी सांगितलंच नाही. माझा मूळ मुद्दा तर सोडून दिल्यासारखा आहे !

तुम्ही तुमच्या घराचे उदाहरण दिलंत, आमच्या घरी असे नाही, मला तरी शं-ज, च्या संगीतात फारशी रुची नाही. आणि माझ्या मुलालातर नक्कीच नसेल.

हिमेश २ वर्षांनी आठवणारच नाही, कारण अजून कोणीतरी त्याची जागा घेतली असेल. त्याचे ( तुम्हाला न पटणारे ) कारण मी वर दिलेच आहे.

मयुरेश वैद्य.