उन्हाळ्याबद्दल मीही कधी ऐकलेले नाही. परंतु, माणसाच्या गाठीचा अनुभव हा त्याने पाहिलेल्या पावसाळ्यात मोजण्यासाठी असा वाक्प्रचार आहे.
दर पावसाळ्यामागे एक वर्ष अशी काल गणनाही त्यामागे अभिप्रेत आहे.
पावसाळ्या आधी तसेच पावसाळ्यात अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात सर्व अडाखे पावसाळ्या आधी बांधावे लागतात. सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांची शाकारणी पावसाळ्याआधी करावी लागते. गाई-गुरांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यांचीही निगा राखावी लागते. विविध आजार, साथीचे आजार पावसाळ्यात जास्त होतात. हवा दमट असते, आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे काय खावे, कसे खावे, किती खावे ह्याचीही गणिते पावसाळ्यात बदलतात. प्यायचे पाणी मुबलक असले तरी दूषित असण्याची शक्यता जास्त असल्यामुळे उकळून प्यावे लागते. मुलांना थंडी, वारा आणि साथीच्या रोगांपासून वाचवावे लागते. किडे, मुंग्या, साप, विंचू असे सरपटणारे प्राणी स्वतःचा जीव वाचवायला मनुष्यप्राण्याच्या राहत्या जागांकडे वळतात. त्यापासूनही संरक्षण करावे लागते. घराच्या आजूबाजूला डबकी साठू नयेत म्हणून खबरदारी घ्यावी लागते. पूर्वीच्या काळी आड असायचे. सांडपाणी किंवा इतर ओहोळ आडात मिसळू नयेत ह्या कडे लक्ष द्यायला लागायचे. असा पावसाळा कितीही आवश्यक असला तरी अनेक अरिष्ट घेऊन येतो. ज्याला ह्या सर्वाचा जास्तीत जास्त अनुभव तो जास्त शहाणा. म्हणून शहाणपणाचे मोजमाप अनुभवलेल्या पावसाळ्यांवर होत असे.