सामाजिक समतेसाठी आरक्षण आवश्यक आहे, पण ते पूर्णतः आर्थिक निकषांवर असावे असे मला वाटते.
सहमत.

भावार्थ असो वा आणखी कुठलाही अर्थ, हे वाक्य चीड आणणारे आहे हे आपण मान्य करता की नाही?
हे वाक्य माझे नाही. त्याचा भावार्थ अर्थात मला पटला आहे. कारण त्यांनी न मागताही सरकार जी सवलतींची उधळंण मागासवर्गीयांवर करीत आहे ते पाहता 'सवलती/आरक्षण' कुठल्याही टोकाला जाऊ शकते हा भावार्थ आहे. 

आपण आपले मित्र कांबळी यांचे उदाहरण दिलेत, आता मी असे विचारतो, हा मुद्दा आपण त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने चर्चाल काय? ते त्यांना अपमानास्पद वाटणार नाही ?
श्री. कांबळी बरोबर मी अशा पद्धतीने चर्चा करणार नाही. कारण मी श्री. कांबळीच्या  गुणवत्तेला बघून मैत्री केली आहे. गुणवंताचा अपमान मी का करू? कांबळी एक मित्र झाला. असे अनेक जात-पात माहीत नसलेले माझे मित्र आहेत हेही मी माझ्या प्रतिसादात दिले आहे. त्यांच्याशीही मी अशा पद्धतीने चर्चा करणार नाही. कारण माझा राग सरसकट मागासवर्गीयांवर नाही. त्यांच्यातील दुष्प्रवृत्तीवर आहे. जसे, दुसरा किस्सा म्युनिसिपालटीच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या युनियन लीडरचा आहे. माझ्या समोर तो किस्सा घडता तर, मी वरील पद्धतीने चर्चा जरूर केली असती. माझा अपमान झाला तरी मी मागासवर्गीयांच्या भावना कुरुवाळत बसू? शक्य नाही.

हा हा हा. अहो, उच्चवर्णीयांतील विचारवंत तरी कुठे आरक्षणविरोधी चळवळ करत आहेत? मला महाराष्ट्रातले कोणतेही (मागासवर्गीय किंवा उच्चवर्णीय) विचारवंत दाखवून द्या ज्यांनी आरक्षणविरोधी एक ठाम भूमिका घेतलेली आहे. एकूनच महाराष्ट्रात आज 'कठोर,खडे बोल' सुणावणारे, कोणत्याही कठीणसमयी निःपक्षपाती पद्धतीने आपली भूमिका मांडणारे, आगरकरांसारखे कोणी विचारवंत उरलेले आहेत की नाही अशीच मला शंका येते.
'विचारवंत' म्हणजे विचार करू शकतात ते. सवर्णांमधील विचार करू शकणाऱ्यांमधीलच एक गट आंदोलन करीत आहेत. ते आगरकरांप्रमाणे 'सेलिब्रेटी' असण्याची गरज काय?  

नाही, सवलत ही भीक नसते, पण आपण दिलेले उदाहरण चुकीचे आहे. मागासवर्गीय खरेदीत सवलत कशी मागतील? याच न्यायाने 'हे मागासवर्गीय लोक उद्या आम्हाला आयतेच खायला द्या असे म्हणतील' असाही युक्तिवाद तुम्ही कराल, पण असं मागासवर्गीय कधीच म्हणणार नाहीत.

कसे चुकीचे आहे? उद्या सरकारने फतवा काढला तर मागासवर्गीय त्याला विरोध करीतील असे आपल्याला म्हणायचे आहे? मला मान्य की मागासवर्गीय तशी मागणी करणार नाहीत, पण सरकार फुकट काही देत असेल तर मागासवर्गीयच का सवर्णही कसे लाज सोडून फुकट गोष्टींच्या मागे धावतात. हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. गेल्या प्रलयंकारी पावसानंतर शिवसेनेने आमच्या वॉर्डात ज्यांचे नुकसान झाले त्यांना माणशी १००० रु. ची मदत देऊ केली. भाड्याचे घर सोडून स्वतःच्या फ्लॅटमध्ये गेलेल्या आणि त्या भाड्याच्या घरात १ चमचाही नसलेल्या घरातील सामानाच्या नुकसानीचे एक-एक हजार रुपये सवर्णांनी घेतले आहेत. ह्यावर मी आक्षेप घेता, ' मग काय झालं? आमचेच (टॅक्स रूपाने भरलेले) पैसे आम्हाला मिळाले तर लाज कसली?' असे उत्तर मिळाले. सारांश, सवर्ण काय आणि मागास काय कोणीही सरकारने काही फुकट दिले तर नाही म्हणत नाहीत हे कटू सत्य आहे. मागासवर्गीयाने ते केले तरी चुकीचे आणि सवर्णाने केले तरीही चुकीचेच.

 इथे लक्षात घेणे आवश्यक आहे की आम्हाला आयत्या पदव्याच द्या अशी मागासवर्गीयांची मागणी नाही, तर ह्या पदव्या मिळवण्याची एक संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. जे गरीब आहेत,ज्यांना वर्षानुवर्षे संध्या नाकारल्या गेल्या, त्यांना काही बनण्याची संधी द्या,

कशा संधी नाकारल्या गेल्या? नगरपालिकेच्या शाळा मोफत शिक्षण देतात. दाते पुस्तकांचे वाटप करतात. ज्याची इच्छा आहे त्याला शिक्षण प्राप्त करण्याची संधी महाराष्ट्रात तरी आहे असे मला वाटते. आमच्या वेळी तर नगरपालिकेच्या शाळांतून सरकार मोफत दूध वाटप करायचे. शिक्षणाचा स्तरही चांगला असतो. पेपरच्याच बातम्यांवर विश्वास ठेवायचा तर खेडोपाडी एक शैक्षणिक वर्ष संपले आणि सुट्या पडल्या की नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकाला घरोघर फिरून पुन्हा विद्यार्थी जमवावे लागतात. त्यांच्या पालकांना समजवावे लागते की तुमच्या पाल्याला शाळेत पाठवा. शिकू द्या. (हा शिक्षक अनेकदा सवर्ण असतो.)

फक्त गरीब असल्यामुळे काही बनून दाखवण्याची (नि नंतर हवे ते खरीदण्याची) त्यांची संधी तुम्ही हिरावून घेऊ नका एवढेच आम्ही म्हणतो.

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना साहाय्य करण्यास कोण विरोध करतो आहे. मनोगतावरही नाही आणि बाहेरही नाही. त्यामुळे वरील मुद्दा ह्या चर्चेत गैरलागू आहे.

ही उदाहरणे आपण दिलीत खरी, पण त्यांचे प्रयोजन कळले नाही.

दुर्दैवं माझं. मागासवर्गीयांनी 'सूड भावनेने' वागू नये एवढे एकच प्रतिपादन करायचे आहे. मैत्रीचा, सहकार्याचा हात पुढे करून आणि मागूनच उद्धार होऊ शकतो. तुझ्या पूर्वजांनी माझ्या पूर्वजांवर अत्याचार केला म्हणून मी तुझा अपमान करणार ही वृत्ती प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा ठरू शकते.

आपण दोन उदाहरणे दिलीत, मी याविरुद्ध दोनशे देऊ शकतो. परंतु, हा म्हणजे एकाने गाय मारली तेंव्हा दुसऱ्याने वासरू मारण्याचाच प्रकार झाला.

दोनशे नाही आपण दोन हजारही देऊ शकाल. संख्येचे दावे दोन्ही बाजूंनी करता येतील. पण माझी दोन उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. आपल्याला ती प्रातिनिधिक वाटली नाही तरी माझी हरकत नाही. पण माझ्या आयुष्यातली ती सत्य घटना आहे आणि त्याने (आणि अशा इतर) घटनांनी माझे विचार घडविले आहेत. तरीही, आरक्षणाच्या विरोधात मी नाही. मागासवर्गीयांवर अन्याय होऊ नये तसाच सवर्णांवरही अन्याय होऊ नये. म्हणून वेगवेगळ्या शाळा/कॉलेजीसचा विचार मी मांडला आहे. तसेही करायचे नसेल तर ६०% खालील (मागास आणि सवर्ण एकत्र) आणि ६०% वरील (मागास आणि सवर्ण एकत्र) अशी वेगवेगळी कॉलेजीस काढून (जातिनिहाय आरक्षण न ठेवता) ही समस्या सोडवावी.

मग अशी उदाहरणे देऊन काय होणार? त्यामुळे उलटाच परिणाम होईल असे वाटते.
अशी उदाहरणे देऊन नाही उदाहरणातील 'वृत्ती'मुळे उलटा परिणाम होईल.

पण मागासवर्गीय गट एकत्र येऊन आरक्षण विरोधी चळवळ का चालवत नाहीत? सवलतीचे जातीय निकष बदला असे सरकारला ठणकावून का सांगत नाहीत? आर्थिकदृष्ट्या अत्यंत सबल असणाऱ्या परंतु जातीच्या आधारावर सवलतींचा फायदा उठविणाऱ्या मागासवर्गीय बांधवांविरद्ध आवाज का उठवत नाहीत?
हम्म्म. पण याचा अर्थ मागासवर्गीय लोकांचा आरक्षणास पाठिंबा आहे असा आपण कसा काढलात?
आरक्षणाला विरोध नाही, म्हणजेच पाठिंबा. मूक हिच संमती.

आता देशभरात जी निदर्शने झाली त्यात मागासवर्गीय लोक नव्हतेच हे आपण ठणकावून सांगू शकता काय?
आरक्षित टक्केवारी इतके मागासवर्गीय त्यात सहभागी आहेत असे आपण ठणकावून सांगू शकता का?
ह्या आंदोलनात १०० टक्के सवर्ण सहभागी आहेत असे आपण ठणकावून सांगू शकता का?
उत्तर आहेः नाही. कोणीच काही 'ठणकावून' सांगू शकत नाही. मग उगीचच वादासाठी वाद म्हणून असे मुद्दे का उपस्थित करावे?

कांबळी नांवाचा माझा एक, इयत्ता ५वी पासूनचा मित्र, आज तागायत मित्र आहे. हा मागसवर्गीय आहे हे माहीत आहे म्हणून त्याचे नांव दिले. बाकी असे अनेक मित्र आहेत की ज्यांची जात कुठली हे माहीतही नाही. मी 'गुणवत्ता' पाहूनच मैत्री करतो. आडनांव आणि जात पाहून नाही.
हम्म्म. यासाठी आपले अभिनंदन. आता माझा एकच प्रश्न आहे, वरील चर्चेतील भाषा वापरून आपण आपल्या मित्रांबरोबर अशीच चर्चा केली असती काय?

एकच प्रश्न आपण विनाकारण दुसऱ्यांदा विचारता आहात. ह्याचे उत्तर मी वर दिले आहे. तेंव्हा इथे पुन्हा कष्ट घेण्याची मला आवशक्यता वाटत नाही.

माझ्यापुरता हा विषय मी संपवला आहे.

धन्यवाद. माझ्या मनात मागासवर्गीयांबद्दल आकस नाही. खात्री असावी. मला वाटतं परदेशांत राहणाऱ्या (निदान आखाती प्रदेशांत) अनेक सवर्णांना मागासवर्गीयांच्या भावना काही प्रमाणात समजू शकतात. कारण इथे स्थानिक आणि परदेशी अशी वेगवेगळी वागणूक ते अनुभवत असतात. स्थानिकांची परदेशींबद्दल असणारी तुच्छ भावना, त्यांच्या वागण्या बोलण्यात नेहमीच जाणवत असते. इथे तसे म्हंटले तर 'मागासवर्गीय' ते आहेत. परंतु, देश त्यांचा आहे, त्यांचा हक्क मोठा आहे. सरकार त्यांच्या बाजूने आहे. हे वास्तव आहे. त्यांच्याशी मिळते जुळते घेऊनच आपला कार्यभाग साधायचा आहे. त्यांच्यातही हुशार, समंजस आणि व्यवहारी अरब आहेत. त्यांचा नेहमीच आदर केला जातो.
माझ्या ओळखीत/नात्यात घरच्या कामवालीच्या मुलांचे शिक्षण, कपडे, दुखणी-खुपणी करणारे अनेक आहेत. माझ्या मावसबहिणीने तर (ती एम्.ए आहे) शाळेची प्रिन्सिपलशिप सोडून कामवाल्यांच्या, रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या मुलांना स्वतःच्या घरी मोफत शिकवण्या केल्या आहेत. त्यांच्या अंगावरील फाटके कपडे पाहून, दारोदारी भटकून, जुने पुराणे कपडे त्यांच्यासाठी गोळा केले आहेत. इथे आखाती देशातही अनेक जणं भारतातील शाळांमधून १-२ विद्यार्थ्यांना 'दत्तक' घेऊन त्यांच्या शिक्षणाचा (पुस्तके, गणवेशासहित) सर्व भार उचलतात. आणि हे सर्व जात-पात विचारून केले जात नाही.
सवर्णही मागासांना संधी देण्यास उत्सुक असतात. पण त्यांच्या स्वतःच्या मुलाबाळांवर अन्याय करून नाही. तशी अपेक्षा करणे सूडबुद्धीचे होईल. असो. मीही हा वाद इथेच मिटवत आहे.
धन्यवाद.