-मा. प्रियालीताई,

आपले विचार छान आहेत. अगदी २१ व्या शतकाला अनुसरून. अभिनंदन!(कृपया नोंद घ्यावी - हा उपहास/उपरोध नव्हे!)

काही लिहावेसे वाटले ते असे,

फ़ोटो किंवा वंशावळीचा प्रश्न नाही. परंतु आपण ज्यांना (पणजोबा, खापर पणजोबा ई. ई. ) पाहीलेच नाही, अनुभवलेच नाही, पण "ते होते" हे आपण मानतो. का? कारण आज आपण अस्तित्वात आहोत.

अहो, हेच तर ते सत्य आहे की आपण आहोत, ही सारी सृष्टी आहे, हे सगळे काही एका विज्ञानाच्या जोरावर नाही चालत! आधी सगळे अस्तित्वात आले, आणि मग त्यातले सो कॉल्ड "विज्ञान" आले/समजले तुम्हा आम्हाला,  बरोबर ना!

हे सारे आधिच अस्तित्त्वात आहे. कसे? शतकानुशतके युगानुयुगे अव्याहत पणे चालु आहे... का? कसे? कोण चालवतो या सगळ्याला?

नक्कीच तिसरीच कोणीतरी शक्ती आहे. जे हे सगळे सांभाळतेय.

रासायनीक दृष्ट्या मृत आणि जीवंत शरीर सारखेच असते ना, पण माणुस जेव्हा मरतो, तेव्हा नक्की काय होते हे आजही "विज्ञानाला" समजले नाही... का?

मला तरी असे वाटते की, जिथे माणसाची बुध्दी आणि मग कल्पना शक्ती थांबते "तिथेच त्याची" सत्ता सुरू होते. आणि त्यालाच "देव" ही संज्ञा वापरली जाते.

अहो बीजगणित तुम्ही शिकलात ना, त्यात सुध्दा पहील्याच स्टेपला, "क्ष" (एक्स)

अशी एक "माहीत नसलेली" संख्या "मानावीच" लागते ना. मगच पुढे जाता येते.

साध्या गणिताची ही कथा तर मग या "साऱ्या विश्वाच्या" पसाऱ्याचे काय?

तिथेही जे माहीत नाही "तेच" आम्ही लोक "देव" मानतो.

सचिन, अमिताभ, ऐश्वर्या, राजकारणी हे अत्यंत भित्रे लोक आहेत आणि आपल दुर्दैव की आपण त्यांना आदर्श मानतो. त्यांच्या गल्लीतला आणि घरातला देव त्यांना का पावत नाही हा मला न सुटलेला प्रश्न.

हे लोक भित्रे?? माफ़ करा, पण निसर्गाचा एक अनुभव सांगतो (जुन्या लोकांनी पण असेच म्हटले आहे) पटला तर बघा...

अहो, एखादे झाड जेव्हा फ़ळांनी एकदम गच्च भरते तेव्हा ते जास्ती ताठ नाही दिसत, थोडेसे वाकते. अर्थ असा की, जसजसे लोक मोठे होतात तसे ते लीन / नम्र होत जातात. (सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही ही गोष्ट वेगळी.)

तर ते नम्रपणे देवा पुढे उभे राहतात. आपल्याला जे मिळाले आहे, आपण जे मिळवले आहे त्याचा गर्व मनात होऊ नये, या साठी हे सगळे "त्या"च्या कृपेने झाले म्हणने. त्याला शरण जाणे,  याला आपण त्यांचा भित्रेपणा संबोधावे, हे वाचून फ़ारच खेद वाटतो.

आणि दुखःच्या, कठीण प्रसंगाच्या क्षणी ते/आम्ही देवाकडे जातो. त्याला तुम्ही कदाचित भित्रेपण म्हणत असाल. परंतु तिथे जाण्याने जर मनाला एक "पॉझिटीव्ह" दिशा मिळत असेल उभारी मिळत असेल परिस्थीतीशी लढण्याचे तिला सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळत असेल तर तसे करण्यात काय गैर आहे.

काही लोक नाही का जात, एखाद्या गुरुकडे. आपण नाही का शाळेत असताना एखादे गणित आडले की आपल्या सरांच्याकडे जायचो.

मग आयुष्याचे गणित आडल्यावर देवाकडे गेले म्हणुन काय बिघडले.

यात भित्रेपणा तो कोणता/ कसा?

देरे हरी खाटल्यावरी वृत्ती नक्कीच निंदनीय आहे. परंतु जे लोक केवळ एक मानसिक आधारासाठी देवाकडे जातात, त्यांचे वर्णन "भित्रे" करणे जरा अयोग्य वाटते.

दुसरे असे की, त्यांना आदर्श आपण मानतो पण ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामगीरी बाबत, देवळात जातात म्हणुन नव्हे.

(तसे तर राज्याचा मंत्री सुध्दा आषाढी ला पंढरपूरात जातोच की "सपत्नीक!!")

आपला स्वार्थ साधण्यासाठी ते आपण समाजाच प्रतिनिधीत्व करतो हे भान सोडून अशा कृती करत असतात.

ते कुठे म्हणतात की आम्ही समाजाचे प्रतिनीधीत्व करतो? त्यांना त्यांचे सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाही का?

आणि स्वार्थ? कुणाला चुकलाय? क्षणोक्षणी आपण तेच तर करत असतो की. मग देवापुढे गेल्यावर स्वार्थ का लपवायचा. ताकाला जाउन भांडे लपवल्यासारखे होईल ते. मी कठीण परिस्थीतीत आहे मला मदत कर असे म्हटले म्हणजे काय बिघडले. (मदत = मानसिक आधार)

त्यामुळेच की काय न जाणे पण सिद्धिविनायका समोर मंगळवारी तरुण मुला मुलींच्या रांगा असतात. यांना काम धंदे नाहीत का असा प्रश्न मलाही पडतो. असो.. ती  त्यांच्या श्रद्धेची कल्पना असू शकते. समजूया की त्यांना मनःशांती लाभली असावी.

देवळात देवासमोर हात जोडुन बसले म्हणजे त्यांना काम नाही असे कसे? तेथे त्यांच्या मनाला शांतता लाभत असणार म्हणुनच जात असणार ते. काही लोक एक विरंगुळा म्हणुन जातात.

जसे काही लोक पिक्चर च्या रांगेत उभे राहतात , पिक्चर बघतात, कशासाठी? मन वेगळीकडे गुंतवण्यासाठी, मनाला विरंगुळा मिळण्यासाठी, शांत होण्यासाठी.

मग आपण त्याला काहीच म्हणत नाही, पण जर एखादा देवळाकडे वळला की लगेच "काम धंदा" काढतो त्याचा... हे बरे नव्हे!

प्रत्येक माणूस स्वतःच्या गरजे प्रमाणे, कुवती प्रमाणे दुसऱ्या गोष्टिचा अर्थ काढत असतो पण "लार्जर द्यान लाईफ" अर्थ जेव्हा लोक काढतात तेव्हा त्यांनी त्या पुष्ट्यार्थ दाखले द्यावेत. नाहीतर इतरांनी त्यांना "उचलली जीभ लावली टाळ्याला" अस का म्हणू नये?

बरोबर आहे तुमचे म्हणने.

अहो पण मी आधीच लिहीले तसे, जिथे माणसाची बुध्दी नी कल्पना शक्ती थांबते तिथे त्याची सत्ता सुरू होते.

आणि "लार्जर द्यान लाईफ" तुमच्यासाठी हो! आपले लाईफ़ ते केवढे. त्यात जे सामावले नाही, सामावणार नाही ते सगळे म्हणजे कल्पनेच्या भराऱ्या का?

साधा २-३ सेकंद भूकंप झाला तर लाखो करोडो माणसांचे अस्तित्व संपते. ज्याला मर्यादा असते तो समुद्र खवळला तर काय झाले ते नुकतेच बघितले आपण.

मग आपल्या "लाईफ़" ची मर्यादा काय? किती मोठी आहे आपली लाईफ़?

एखादा उंच कडा बघितला की आपल्या लाईफ़चा आवाका किती (आपली लाईफ़ निसर्गापुढे किती क्षुद्र आहे) हे आपोआप कळते.

बेडकी फ़ुगली म्हणजे काय बैल होते का? किंवा बेडकी च्या पेक्षा काही मोठे असुच शकत नाही का?

दीवार चित्रपट आपण बघितलाच असेल. अमिताभ आयुष्यभर देवाजवळ जात नाही, पण शेवटी त्याच्यासमोरच हात पसरतोच ना?

मला मान्य आहे की तो चित्रपट आहे. परंतु सामान्य माणसाच्या जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा सगळे मार्ग बंद होतात आणि अशा काही अनाकलनीय गोष्टी घडत जातात की सगळे विज्ञान एका बाजुला गुंडाळून ठेवावे लगते, आणि माणुस देवा समोर नतमस्तक होतो.

देव हा काही पुरावा देउन "हा बघ" असा असतो देव म्हणता येवु शकत नाही. तो एक अनुभव/अनुभूती आहे.

मानला तर देव, नाही तर त्याचाच दगड व्हायला वेळ लागत नाही .

आपण अमेरीकेचे येवढे गुणगाण करतो विज्ञानवादी म्हणुन, परंतु त्यांच्या चलनावरही  लिहिलेले असते, "वुई ट्रस्ट इन गॉड".

अहो पतंग कितीही वर गेला तरी त्याला आधार देणारी /सांभाळणारी दोरी असावीच लागते, माणसाच्या जीवनाला "आधार" देणारी "देव" ही अशीच एक अदृश्य दोरी आहे असे मला वाटते.

असो,

--सचिन