भोमेकाका, तुमच्या भावना मला कळल्या. आणि टगोजीरावांनाही कळल्या असतील. "यू हॅव टू बी इन द सिस्टीम" चा सल्ला आता तुम्हाला मिळणार ;) ! असो.

---

कोक, पेप्सीची, किंवा कावासाकीची भारतातील घोडदौड ही भारतात घट्ट पाळेमुळे रोवलेल्या भारतीय व्यवस्थापकांशिवाय बहुतांशी अशक्य आहे हे लक्षात घेतले, तर भारतीय कंपन्यांची इतर देशांतील घोडदौड (यात त्या त्या देशांकडून काम/प्रकल्प मिळवणे हे आलेच) ही त्या त्या देशात घट्ट पाळेमुळे रुजवलेल्या व्यवस्थापकांशिवाय (या गटात कायमचे किंवा निम-कायमचे परदेशस्थ झालेले भारतीय आघाडीवर आहेत हे ओघाने आलेच) बहुतांशी अशक्य आहे - हे लक्षात येणे कठीण नाही.

भाग १ च्या चर्चेत एका भारतीय नेत्याचे वक्तव्य दिले होते. ते १५ वर्षांपूर्वीचे होते. मला खात्री आहे, की "द वर्ल्ड इज फ्लॅट" च्या आजच्या जमान्यात एकही जबाबदार भारतीय नेता असे वक्तव्य करणार नाही. कुठल्याही पक्षाचे सरकार असले, तरी "प्रवासी भारतीय दिवस" धूमधड्याक्यात साजरे होऊ लागले आहेत, आणि इंग्लंड/अमेरिकेतील अनिवासी भारतीयांना इतर देशांपेक्षा उजवे माप मिळते आहे यातच सर्व आले.

खालील आकडेही अत्यंत बोलके आहेतः भारताची परकीय चलनाची गंगाजळी सुमारे १४५ बि.डॉ., भारताची एकंदर निर्यात सुमारे ७६ बि.डॉ., तर परदेशस्थ भारतीयांनी (आपापल्या नातेवाइकांकरिता का होईना, पण) भारतात धाडलेली रक्कम सुमारे २३ बि. डॉ.! ही रक्कम परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीच्या दुप्पट आहे! थोडक्यात, कुणाला आवडो वा नावडो, भारतासाठी ही अनिवासी मंडळी निर्विवादपणे महत्वाची आहेत! दुवा १ दुवा २

परदेशस्थ भारतीयांची पहिल्याच काय, पुढच्या पिढ्यांतली मुलेही भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून असतात (अर्थात, आज त्यांना दिसणारी भारतीय संस्कृती ही झी-टीवी आणि हिमेश रेशमिया संस्कृती असते. आणि म्हणूनच बनियन काढून उघड्याने नाचणाऱ्या "सुलू" ला पाहायला तेही शंभरेक डॉलर मोजतात, आणि बॉलिवूडचीही धन करतात. अर्थात सगळेच असे नाहीत). वर एका प्रतिसादात ज्या इंडीकॉर्प्स चा दुवा आहे, त्याची संस्थापिका सोनल शाह हीही अनिवासी भारतीयच. तिच्याच एका भाषणातील शेझीन सुलेमानचं उदाहरण नक्की वाचा. चौथ्या पिढीतील शेझीनच्या खानदानातून कोणीही दीडशे वर्षात भारताकडे फिरकलं नव्हतं, पण घरी अजूनही कच्छी बोलली जात होती. भारताबद्दल जिव्हाळा वाटायला, आणि भारतात जाऊन/राहून काम करायला तिला ते कारण पुरलं!

अमेरिकेतल्या मंत्रिमंडळात अजून म्हणावी तशी आघाडी नसली तरी मॉरिशस, वेस्ट इंडीज, इंग्लंड सारखी अनेक सशक्त उदाहरणे जगभर सापडतील.

आता देशभक्ती आणि त्याचे श्रेय उपटण्याबद्दलः बरीचशी शाकाहारी माणसे भूतदयेचे श्रेय उपटताना दिसतात. पण त्यातील बहुतेकांचे खरे कारण, हे "कधी खावेसे वाटलेच नाही", किंवा "खाणे जमले नाही", किंवा "मांसाहाराशिवाय काय अडते आहे? डाळीबिळींतून प्रथिनेबिथिने मिळत आहेत, आणि चवीसाठी मामलेदाराची मिसळ आहे, तोवर चिंता नाही" अशी असतात. याचप्रमाणे "सौ चूहे खाके" बिल्ल्या पटापट शाकाहारी बनू लागल्या आणि वर भूतदयेचे श्रेय उपटू लागल्या, तर खुशाल समजावे, की "चवीला अग्ग्गदी चूह्यांसारखे लागणारे" शाकाहारी पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत! (अर्थात हे सगळ्यांना सरसकट लागू होत नाही)

जाता जाताः  आपण सर्वांनी एक जाणीव ठेवायला हवी, की "परदेशात कायमचे वास्तव्य योग्य की अयोग्य" अशी चर्चा करणे हे आज आपण भारतीय आहोत म्हणून"परवडते" आहे, आणि ही आपली "चैन" आहे. भारताची आज इराक किंवा दार्फ़ूर सारखी प्ररीस्थिती असती, तर आज "मातृभू", "भारतभू" म्हणून "भूभू"त्कार करणाऱ्या बहुतांश परदेशस्थांनी भारताकडे ढुंकूनही पाहिले नसते, आणि बहुतांश देशस्थांनी ढुंxxx पर्यंत पंख ताणून परदेशी पलायन केले असते, हे वेगळे सांगायला नकोच (यात विनोद किंवा उपहास नाही).

नंतर संपादित केलेला वाढीव मजकूरः १. वर "ढुं xxx" असा जो शब्दप्रयोग केला आहे, तो टाळता आला असता, असे आता वाटते. त्यामुळे जो कुचेष्टेचा स्पर्ष झाला आहे, तो अपेक्षित नव्हता. २. या परिच्छेदातील मजकूरावर प्रतिसाद द्यायच्या आधी त्यावर परखडपणे विचार करावा, आणि त्यात "बहुतांश" हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तेही लक्षात घ्यावे, ही विनंती.

- कोंबडी