हा वाद बराच वेळ वाचून यात पडावे की नाही असा मनात विचार करीत होतो कारण इथे बऱ्याच जणांच्या भावना उफाळून आलेल्या वाटल्या व कुणाच्या भावना दुखावणे जरा अवघडच असते, नाही का? पण शेवटी मूळ स्वभाव आड आल्याने लिहितो आहे.

- कोणी कुठे राहावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्याने कुठे राहावे हे मी सांगू नये आणि मी कुठे राहावे हे लोकांनी सांगू नये.

- भारतात राहिले की आपोआप देशभक्त आणि भारताबाहेर राहिले की आपोआप देशद्रोही  असा एक समज काही जणांचा झालेला दिसतो तो साफच चूक वाटतो.

- देशभक्ती / देशप्रेम हा ऐच्छिक विषय आहे हो, सक्तीचा नाही. परवडेल त्यांनी घ्यावा बाकीच्यांनी सोडून द्यावा.

- याच विचारात आणखी पुढे जायचे तर मी म्हणेन की असाही वाद घालता येईल की मराठी माणसाने महाराष्ट्रातच राहिले पाहिजे, नाहीतर तो राज्यद्रोही; पुण्यातल्या माणसाने पुण्यात, नाहीतर तो गावद्रोही; सदाशिव पेठेतच, नाहीतर तो पेठद्रोही (ह. घ्या.) ...

- भारताबाहेर राहून जर कोणी विधायक कार्य करीत असेल (मग ते भारतासाठीच पाहिजे असा हट्ट नाही) तर माझ्यामते तो मनुष्य भारतात राहायचे म्हणून भारतात राहणाऱ्यापेक्षा अधिक बरा.

- माझे आणखी एक मत, जर ज्याने त्याने आपापल्या स्वार्थासाठी जिथे असाल तिथे प्रामाणिकपणे काम केलेत ना तर ती मानवतेची सर्वात मोठी सेवा होईल.

आपला (स्वार्थी) इहलोकी.

ता.क.- कोणी मला फासावर लटकविण्यापूर्वीच लिहितो, मी भारतात राहतो, माझे माझ्या कुटुंबावर, पेठेवर, गावावर, राज्यावर, देशावर, जगावर भरपूर प्रेम आहे. जगात कुठेही राहण्याची संधी असूनही इथे राहतो, पण यात त्यागाचा भाग नाही, आवडते, परवडते, म्हणून राहतो.