"परदेशात स्थायिक होऊ नये" याबाजूच्या युक्तिवादात व्यक्त केलेली मते ही सर्व स्वदेशस्थ भारतीयांचे मते आहेत असे मानणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे असे वाटते. सर्व स्वदेशस्थ भारतीय परदेशस्थ भारतीयांना हिणवतात, नावे ठेवतात असे वाटत नाही. 

"परदेशात स्थायिक होऊ नये" असे म्हणण्यामागे, देशाविषयी असणाऱ्या कळकळीपासून "मला जाता/राहता आले नाही" अश्या मत्सरापर्यंत कोणत्याही भावना असू शकतात.

"परदेशात स्थायिक होऊ नये" या बाजूने पटण्यासारखा युक्तिवाद म्हणजे मूलभूत सोयींपासून शिक्षणापर्यंत देशाने केलेल्या खर्चाचा* प्रत्यक्ष फायदा देशाला होत नाही. बुद्धिमान लोक शिक्षण घेऊन परदेशात गेल्याने तंत्रज्ञानाच्या विकासात आणि संशोधनात लोकांची कमतरता जाणवते. तांत्रिक प्रगती कमी वेगाने होते, इतर देशांवर आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते.

अर्थात असे लोक एकूण परदेशात जाणाऱ्या लोकांचा तुलनेत नगण्य असावेत. अमेरिकेत हॉटेल/दुकान चालवणारी किंवा आखाती देशात बलुतेदाराचे काम करणारी व्यक्ती किंवा सध्या मोठ्या प्रमाणावर बाहेर जाणारे संगणक सेवा (IT Services) क्षेत्रातील लोक परदेशात गेल्याने होणारे प्रत्यक्ष नुकसान कमी आहे असे वाटते. उलट काही माणसे बाहेर गेल्याने भारतातील काही अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. 

प्रत्येकाने आपण आहोत तिथे राहून देशासाठी काय करता येईल ते पाहणे आणि तसे करणे योग्य आहे. सदैव भारताला आणि भारतीयांना नावे ठेवणारे काही परदेशस्थ आहेत त्याप्रमाणेच भारतात राहून तसेच करणारे स्वदेशस्थही आहेत.

भारतात राहणारे सगळे देशभक्त आणि बाहेर गेलेले सगळे देशद्रोही हे अतिरंजित वाटते. तसेच दुसऱ्याने काय केले म्हणून आम्ही करावे असा विचार न करता आपल्या परीने जे जे शक्य आहे ते सर्व काही करावे असे सुचवावेसे वाटते.

*एका अमराठी व्यक्तीशी झालेल्या "देशाने माझ्यासाठी काय केले?" या चर्चेत वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, संरक्षण (सैन्य), कायदा सुव्यवस्था इतर सोयीसुविधा याने त्याचे समाधान झाले नाही. शेवटी "देशाने माझ्यासाठी केले याआधी मी देशासाठी काय केले याचा विचार करावा" असे सांगितले तरी काही उपयोग झाला नाही. "झोपलेल्याला जागे करता येते, सोंग घेतलेल्याला नाही" हेच खरे. ही भावना (देशाने माझ्यासाठी काय केले?) दोन्ही बाजूच्या बऱ्याच लोकांत दिसून येते.