आपण माझ्या अनेक मुद्द्यांशी सहमत आहात हे पाहून आनंद वाटला. तरीही काही मुद्दे राहिले आहेतच, त्यांवर आता बोलतो.

शाकाहाराच्या उदाहरणात हिंमत नाही, असे मी म्हटलेले नाही. "जमत नाही" (माझे स्वतःचे उदाहरण), "गरज नाही", "वाटले नाही", "अडत नाही", "चालत आले आहे ते चालू द्या" ही मात्र बहुतांश लोकांची शाकाहाराला धरून राहण्याची कारणे आहेत, यात दुमत नसावे. यातील काही लोक मात्र त्यातूनच भूतदयेचे श्रेय उपटतात. आक्षेप त्याला आहे. तुम्ही (व्यक्तिशः) तसे करणार नाही, असे तुमच्या प्रतिसादांवरून वाटते.
इथे आपण (जाणूनबुजून ?) विषयांतर करत आहात. शाकाहाराचे तुम्ही उदाहरण दिलेत, मूळ मुद्दा तो नव्हे. त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? मांसाहार करण्याची हिंमत नाही म्हणून शाकाहारी तसे अमेरिका या स्वर्गात काही केल्या जाता येत नसल्याने आम्ही नाईलाजाने भारतात राहतो, म्हणून आम्ही देशभक्त आहोत असे तुम्ही म्हणत आहात.असे धक्कादायक विधान आपण कसे करू शकता एवढेच आम्हाला सांगा.
देशातील परीस्थिती अत्यंत बिकट झाली, तर नाईलाजास्तव का होईना, बहुतांश लोक देश सोडण्याचा निर्णय घेतील, आणि देशाबाहेर असणारे लोक हे इतर देशांच्या नागरीकत्त्वावर लाथ वगैरे मारून परत जाण्याचा विचार मनातही आणणार नाहीत - आणि तशी वेळ आज आपल्यावर नाही म्हणून आपण अशा चर्चा करू शकतो, हा तो मुद्दा आहे.

पुन्हा विषयांतर. जेव्हा एखाद्या देशात अराजकासारखी किंवा यादवीसारखी परिस्थिती असते किंवा एखाद्या जात/धर्म/पंथसमूहाला विनाकारण लक्ष्य केले जाऊन त्यांचे त्या देशात राहणे अगदी दुरापास्त केले जाते तेव्हा ते लोक तो देश सोडणारच. त्यात विशेष काय? इथे त्या लोकांच्या देशप्रेमाचा प्रश्नच कुठे येतो? दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांनी जर्मनी सोडला म्हणून ते देशद्रोही ठरतात काय?
तुम्ही इराकचे उदाहरण दिलेत म्हणून मी विचारतो, समजा आज जर इराकमधल्या शिया व सुन्नी या गटातल्या संघर्षामुळे जगणे अशक्य झाल्यामुळे यातल्या कुठल्याही गटाने जर आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला तर ते देशद्रोही कसे ठरतील? तुम्ही दिलेल्या काश्मीरी पंडितांच्या उदाहरणाला काय अर्थ आहे? म्हणजे भारत सोडून गेलेले सगळे परदेशस्थ अशा एखाद्या वणव्यामुळे होरपळून परदेशी गेले असे आपण म्हणता आहात काय?

देशातील परीस्थिती अत्यंत बिकट झाली, तर नाईलाजास्तव का होईना, बहुतांश लोक देश सोडण्याचा निर्णय घेतील, आणि देशाबाहेर असणारे लोक हे इतर देशांच्या नागरीकत्त्वावर लाथ वगैरे मारून परत जाण्याचा विचार मनातही आणणार नाहीत.

असे तुम्ही लिहिलेत. अहो पण, ही अपवादात्मक परिस्थिती झाली. ती सोडून द्यावी. आपल्या देशात राहणे/परतणे म्हणजे मृत्युला कवटाळणे असल्यावर देशाबाहेर राहणेच योग्य. इथे देशभक्तीचा प्रश्न येतच नाही. परंतु, नितीन यांचा मूळ मुद्दा तो नव्हे. त्यांचा मूळ मुद्दा भारतात परतणे सहजशक्य असतानाही परदेशात राहणारे लोक हा आहे. हे योग्य की अयोग्य यावर आपण बोलत आहोत. हो की नाही?

आता मात्र आपण चर्चा वैयक्तिक पातळीवर नेत आहात. मी प्रत्येक ठिकाणी बहुतांश हा शब्द अधोरेखित केला आहे. तेथे तुमचे-माझे वैयक्तिक उदाहरण अपेक्षित नाही.
असे कसे? तुम्ही वापरलेल्या बहुतांश या शब्दाला काय अर्थ आहे? मी तर म्हणतो ती शुद्ध पळवाट आहे. हे म्हणजे १००० लोकांसमोर उभे राहून "तुमच्यातले बहुसंख्य महामूर्ख नि नालायक आहेत." असे म्हणण्यासारखे झाले. याचा अर्थ काय होतो? आणि तुम्ही मला बहुसंख्यातून का वगळलेत? कृपया असे करू नका. मी बहुसंख्यांमधेच येतो असे माना नि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

कलोअ,

एक वात्रट