वेदश्री,
मी तसा समजावून सांगण्यात खूपच मठ्ठ आहे... एक प्रयत्न येथे करतो आहे. उत्साहाने हे गणित वाचल्याबद्दल धन्यवाद!

---------------------------------------------------
दुसरी पायरी सविस्तरपणे - नियम ५ मुलींसाठी सिद्ध असेल तर त्यावरून ६ मुलींसाठी सिद्ध करू या!

६ मुलींचा गट - वेदश्री, मृदुला, संवादिनी, मीरा, साती, आणि ऐश्वर्या.

आता हे सिद्ध करायचे आहे की जर या ६ जणींच्या गटांत एखादी जरी नीलाक्षी असेल तर सर्वच जणी नीलाक्षी असतील! जर एकही नीलाक्षी नसेल तर काही सिद्ध करायचा प्रश्नच नाही. शेवटी जगात सर्वच जणी नीलाक्षी आहेत हे सिद्ध करण्यासाठी जगात एकतरी नीलाक्षी आहे इतकेच पुरेसे आहे.

  1. तर या गटात ऐश्वर्याचे डोळे निळसर आहेत (घारे... पण निळसर म्हणू या!).
  2. वेदश्रीला बाजूस सारून "मृदुला, संवादिनी, मीरा, साती, आणि ऐश्वर्या" या पंचकन्यांचा गट बनविला!
  3. वर दिलेला नियम ५ मुलींसाठी सिद्ध असेल तर मृदुला, संवादिनी, मीरा, साती, आणि ऐश्वर्या या पाचही जणींचे डोळे निळे आहेत हे सिद्ध!
  4. आता मृदुलाला बाजूस करू या. तिचे डोळे निळे आहेत हे "3." वरून सिद्ध झालेले आहेच!
  5. "वेदश्री, संवादिनी, मीरा, साती, आणि ऐश्वर्या" या पंचकन्याही ऐश्वर्याकृपेकरून नीलाक्षी! मृदुला नीलाक्षी आहे हे तिला बाजूस सारण्यापूर्वीच माहिती आहे.
  6. म्हणजे वेदश्री, मृदुला, संवादिनी, मीरा, साती, आणि ऐश्वर्या यांतील ऐश्वर्याचे डोळे निळे आहेत हे माहिती असेल तर या साऱ्या जणींचे डोळे निळेच असतील याची सिद्धता झाली!!