बहिणाबाई चौंधरींना, आम्ही पामर, कवयित्री म्हणून ओळखत आलो आहोत. त्यांना संतपद कधी आणि कसे प्राप्त झाले यावर प्रकाश टाकलात तर आमच्याही ज्ञानात भर पडेल.
या बाबत भोमेकाकांशी सहमत. बहिणाबाई चौधरी या कवी सोपानदेव चौधरी यांच्या मातोश्री. आपल्या आईचे लेखन सोपानदेव चौधरी यांनी आचार्य अत्रे यांना दाखवले. ते अप्रतिम लेखन पाहून अत्र्यांनी पुढाकार घेउन ते प्रसिद्द्ध केले. बहिणाबाईंच्या कविता अहिराणी भाषेत आहेत. त्या काळच्या सर्वसामान्य स्त्री प्रमाणे त्या सुध्दा संसार, मुलेबाळे, शेतीकाम यात गुरफट्लेल्या होत्या. पण त्यांच्या दैनंदिन कामातील दाखले देऊन त्यांनी अप्रतिम कविता रचल्या. फार वर्षांपूर्वी दूरदर्शन, मुंबई ने त्यांच्यावर एक लघुपट तयार केला होता. त्यात भक्ती बर्वेंनी बहिणाबाईंची भूमिका केली होती. केवळ अविस्मरणीय असा अनुभव होता तो!
पण त्यांना संत बहिणाबाई असे म्हटलेले काही ऐकिवात नाही. त्यांनी अभंग रचल्याचेही माहित नाही. त्यांची लगेचच आठवणारी एक कविता म्हणजे,
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर,
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर!
मन पाखरु पाखरु, त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर
अरे, ईच्चू साप बरा, त्याले उतारे मंतर
मन एवढं एवढं, जसा खाकस (खसखस)चा दाना,
मन केवढं केवढं, त्यात आभाय माईना!
असं कसं मन देवा, असं कसं रे घडलं?
कसं जागेपणी तुले असं सपन पडलं!
(अरेच्चा, बरंच आठवलं की! तरी काही कडवी बाकी आहेत.) किती साधी भाषा, तरी केवढी अर्थपूर्ण कविता! आशाताईंच्या सुस्वरात ती आपण अनेकदा ऐकलीही असणार.
स्वाती