आपली खंत खरोखरच अनेकांच्या मनात आहे. अनेकदा वाकप्रचार नको त्या अर्थाने वापरले जातात, यांत राजकारणी आघाडीवर! ८४ च्या दंगलीत जनतेला दूरदर्शनवरून शांततेचे आवाहन करताना वसंतदादा पाटील म्हणाले होते की 'आज दुपारी भिवंडी येथे दंगलीची मुहूर्तमेढ झाली आहे'. स्थानिक वाहीनीवर आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना शिवसेना आमदार अनंत तरे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षाच्या माणसा विषयी म्हणाले की 'ते धंद्यात खोटे बोलत आहेत' (धादांत खोटे बोलत आहेत असे म्हणायचे असावे).
दुर्दैवाने हल्ली मराठी कलाकार व खास करून मालिका यांनी तर मराठीची सुपारी घेतली आहे. इ टिव्ही मराठी वर मानाचा मुजरा नामक एक मराठी (?) कार्यक्रम असतो त्यात अनेकद अधून मधून मराठी सुद्धा बोलतात. ईंग्रजी शब्दांनी युक्त असे मराठी बोलणे हे मध्यंतरी प्रतिष्ठेचे लक्षण झाले होते. आपण जरा 'वरच्या वर्तुळात' वावरतो हे दाखवण्यासाठी बहुधा अनेकांना मराठी वर्ड्स रिमेंबर न होणे वा मराठीतुन फिलींग्स एक्स्प्रेस न करता येणे आवश्यक वाटू लागले. इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अमराठी मित्रमंडळींचे वाढते प्रमाण, मराठी साहित्यावरील आक्रमण, मराठी लोकांची अतिसहिष्णुता (हिंदीला नको इतकी सलगी) या अनेक कारणांमुळे अनेक शब्द हद्दपार झाले आहेत. फ़क्त स्वयंपाकघर घ्या. बोगणी, वेळणी, विळी हे शब्द विशीतील पिढीला तर कुळिथ, साटोऱ्या, पचडी वगरे शब्द १२ वर्षाखालच्या पिढीला माहित नसतात.
झकास, फर्मास, खुमासदार, लज्जतदार ही विशेषणेही विरत चालली आहेत. सुबक ची जागा क्यूट ने घेतली आहे. चालायचेच. काळ बदलतो आहे. कुणी मराठीचा अट्टाहास केलाच तर त्याला कूपमंडूक वा असहिष्णूतेचा टीळा लागतो आहे. आजच्या वेगवान व प्रगतिशील जगात या गोष्टीची दखल घेण्याची गरज कुणाला फारशी भासत नसावी.