पावसाचे वाहन हा पर्जन्यविचारातील अनेक घटकांपैकी केवळ एक घटक आहे. केवळ याच एका घटकावरून पावसाचा अंदाज बांधला जात नसावा. जोशी या पुस्तकात मेघ गर्भधारणेचे नक्षत्र, गर्भधारणेचा कालखंड, वाऱ्याची दिशा, ढगांचे प्रकार, जमिनीचे प्रकार(उदा.- जंगल/अनूप/मिश्र), राशीविचार, ग्रहविचार, वीजेचे प्रकार, गडगडाटाची कारणे, वृक्षवेली व प्राणीकिटकांच्या वागण्यातील बदल, मेघगर्भ परीक्षा इत्यादि बाबी विचारात घेतल्या आहेत.

माझ्या या आधीच्या प्रतीसादात मी वाहन या एकाच घटकाबद्दल बोलत होतो आणि त्या घटकाबद्दल मी अजूनही तेच म्हणतो की ते एक थोथांड आहे कारण याला वैज्ञानिक आधार काही नाही.  अमूक एका नक्षत्राचं अमूकच वाहन का?  किंवा मुळात वाहनं तरी हीच का? उदा मासा किंवा उंट हे वाहन का नाही?  या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर असतं - शास्त्र म्हणतं म्हणून. याला काही अर्थं नाही.

दुसरं असं की शास्त्र किंवा विज्ञान म्हटल्यानंतर, ते विधान तर्क, निरीक्षणं आणि प्रयोग यांच्या द्वारे पुनःपुन्हा सिद्ध करता येऊ शकलं पाहीजे.  वाहनांच्या बाबतीत ते शक्य आहे? आणि जर शक्य नाही तर यावर विश्वास कसा ठेवणार? 

आता तुम्ही वर उल्लेखलेल्या इतर घटकांच्या (म्हणजे वाऱ्याची दिशा, ढगांचे प्रकार, जमिनीचे प्रकार(उदा.- जंगल/अनूप/मिश्र), वीजेचे प्रकार, गडगडाटाची कारणे, वृक्षवेली व प्राणीकिटकांच्या वागण्यातील बदल) बाबतीत मात्र थोडा वेगळा विचार करता येतो   कारण या घटकांना वैज्ञानिक (यात राशीविचार, ग्रहविचार नाही कारण त्यालाही वैज्ञानिक आधार काही नाही) आधार आहे आणि त्यांचा विचार पावसाच्या अंदाजात महत्त्वाचा ठरु शकतो, वाहनांचा नाही.

बऱ्याच वेळा शतकानुशतकं चालत आलेल्या आपल्या समजुतींना एकदम थोथांड म्हणणं आपल्याला खटकतं. आपल्याला ते त्या कारणानं खटकलं असलं तर क्षमस्व.

- मिलिंद