विषय.
संजोप राव, विनायक यांसारखे मनोगती गुरूदत्त-वहिदा प्रकरणावर अधिक प्रकाश टाकू शकतील असेही आम्हास वाटते. हिंदी चित्रपटसृष्टीचा त्यांचा अभ्यास आहे असा आमचा समज आहे.
धन्यवाद.
जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीचा विषय लोकांत चर्चीला जातो तेव्हा श्री गुरुदत्त यांचे नांव सहसा पटकन घेतले जात नाही असेही आमच्या पाहण्यात आले आहे
?????
माझ्या माहितीनुसार असे नाही. कोणत्याही समीक्षकाच्या मापदंडानुसार हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास गुरुदत्तच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. हां, आता गुरुदत्तला आर्थिक यशाची गणिते आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी कधी जमल्या नाहीत हा भाग वेगळा. ( त्या राजकपूरला जमल्या आणि देव आनंदने त्या जमवण्याच्या नादात स्वतःचे माकड करून घेतले!) कोणत्याही कलाकाराला आवश्यक ती संवेदनशीलता गुरुदत्तकडे (वाजवीपेक्षा जरा जास्तच ) होती. ह्रदय तळहातावर घेऊन जगणाऱ्या अशा लोकांची चित्रपटसृष्टीच्या क्रूर ( कणेकरांच्या भाषेत 'मुडदेफरासांच्या') दुनियेत फरफट आणि शोकांतिकाच होते. पण गुरुदत्तला शोकांतिकेचे ( आणि मृत्यूचेही!) एक सुप्त आकर्षण होते. तसा मृत्यू नैसर्गिकरीत्या मिळण्याची वाट न बघता गुरुदत्त स्वतःच त्याच्याकडे चालून गेला.
गुरुदत्त पदुकोण हा तसा मूळचा नृत्यदिग्दर्शक. त्याला स्वतःला नाचाचे उत्तम अंग होते. देव आनंद हा त्याचा जुना ( पुण्याच्या दिवसांपासूनचा ) मित्र. त्या मैत्रीला जागूनच त्याने सुरुवातीच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या आपल्या चित्रपटात देव आनंदला नायकाचे काम दिले. त्यातले काही चित्रपट गाजलेही, पण गुरुदत्तमधला कलावंत कुठेतरी अस्वस्थ होता. 'प्यासा' तील नायकाची भूमिका दिलीपकुमारने नाकारली. (पश्चातबुध्दी म्हणून आता वाटते, युसुफभाईंनी ही भूमिका केली असती तर कदाचित त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका ठरली असती!) मग नाइलाजाने गुरुदत्तने ती स्वतःच करायची असे ठरवले. साहिरचे काव्य, एस. डी. बर्मनचे सूर सोबतीला आले आणि जन्मली एक अजरामर कलाकृती. 'जिन्हें नाज हैं हिंद पर वो कहाँ हैं' हे प्रेक्षकांच्या ह्रदयाला भेदून गेले. 'प्यासा' हिट झाला.
पण त्यामुळे पब्लीकच्या आवडीविषयी गुरुदत्तचा गैरसमज झाला. त्याला वाटले, सगळेच आपल्यासारखे संवेदनशील आहेत. दरम्यान त्याच्या आयुष्यात वहिदा रेहमान येत होती. गीता दत्त बरोबरचे त्याचे वैवाहिक जीवन उध्वस्त होत होते. त्याचा आत्मचरित्रात्मक आणि महत्वाकांक्षी 'कागज के फूल' कोसळला. कैफी आजमी आणि हेमंतकुमार या वेळी त्याला वाचवू शकले नाहीत. गुरुदत्तही आतून कोसळला. वहिदानेही आता साथ सोडली होती. अशा ध्वस्त मनस्थितीत चित्रपटसृष्टीतले शापित गंधर्व सहारा घेतात तो मदिरेचा. मदनमोहन, सी.रामचंद्र, वसंत पवार... किती उदाहरणे द्यावीत! गुरुदत्तनेही तेच केले. सोबत होता झोपेच्या गोळ्यांचा एक मोठा डोस. बस्स! एका तरल, भावुक जीवनाचा शांततेचा शोध संपला!
हे असे का होते? नर्गिस सोडून गेली त्यावेळी राजकपूरने असेच स्वतःला दारूत बुडवून घेतले होते. त्यातून तो फिनिक्सप्रमाणे उठला आणि त्याने 'जिस देश में गंगा बहती है' सारखा सुपरहिट दिला. 'मेरा नाम जोकर' नंतर तो असाच परत कोसळला, आणि परत उठून त्याने 'बॉबी' काढला. असे सावरणे गुरुदत्तला जमलेच नाही. तडजोडी करून यशस्वी होण्यापेक्षा 'मेरे सामने से हटा दो ये दुनिया' हे गुरुदत्तने पत्करले. हळवे मन परत एकदा हरले, पैसा परत एकदा जिंकला!
असो. जोवर आपण आहोत, आपल्यासमोर 'ये महलों, ये तक्तों, ये ताजों की दुनिया म्हणणारा, ख्रिस्तासारखा, गुरुदत्त आहे, 'जायेंगे कहां, कुछ पता नही, चल पडे मगर, रास्ता नहीं' म्हणणारी गीता दत्त आहे, 'जला दो इसे फूंक डालो ये दुनिया म्हणणारा रफी आहे, तोवर गुरुदत्त अमर आहे. द किंग इज डेड, लाँग लिव्ह द किंग!