वृकोदरमहोदय,
तुमचा संताप समजण्यासारखा आहे. जनतेला वेठीस धरणाऱ्यांना जनता जागा दाखवून देते (निदान महाराष्ट्रात तरी, अजून तरी) हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बंद पुकारल्याबद्दल कायदेशीर मार्गाने या पक्षांना पूर्वी शिक्षा झाल्याचे वाचले होते. याप्रकरणातही होईल. शिवाय तपासातून खरे काय ते बाहेर येईल अशीही अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
पण ज्या तातडीने आणि ज्या तीव्रतेने या प्रकरणाचा निषेध झाला तसा तो भिवंडीच्या घटनेचा झाला नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. अर्थात या दोन घटनांचा एकमेकांशी संबध लावण्याची इच्छा नाही किंवा शिवसेनेच्या दंगलीचे समर्थन करायचे नाही, पण न्याय वेगवेगळा का असावा हे कळत नाही. शिवाय भिवंडीमधील घटना अतिशय भयंकर आहे, त्यामानाने शिवसेनेचा गोंधळ काहीच नाही. (इथे व्यक्तिगत मतभेद असू शकतील. पण दोन पोलिसांना दगडांनी ठेचून मारणे अतिशय घातक आहे असे वाटते.)
शिवसेनेच्या गोंधळामुळे व्यक्तिशः आपल्याला, आपल्या सग्यासोयऱ्यांना अडचण भासली की आपण निषेधासाठी लगेच पुढे सरसावतो पण भिवंडीत झालेल्या घटनेचा आपल्यावर थेट परिणाम काहीच होत नाही त्यामुळे "मला काय त्याचे?" असे वाटणे आपल्या वाढत्या असंवेदनशीलतेचे प्रतीकच म्हटले पाहिजे.
दोन्ही घटनांतील दोषींना यथायोग्य शिक्षा व्हावी हीच इच्छा.