सन्जोप राव -

शिवसैनिकांच्या वर्तनाचे समर्थन करणाऱ्यांची कीव करावीशी वाटते.
घटना कोणतीही असो, त्याचा प्रतिसाद हिंसेने देणे हे कुणीही केले तरी समर्थनीय नाही.

हवे तर परत एकदा माझा आणि इतरांचेही आधीचे प्रतिसाद वाचा. एखाद-दुसरा अपवाद वगळता कोणत्या लिखाणात गेल्या काही दिवसांतील विध्वंसक आंदोलनाचे समर्थन आढळले ते कळाल्यास बरे होईल. आपण सामान्यीकरणाचा मोह टाळल्यास गोष्टी मार्गावर येण्यास मदत होईल.

विशेषतः एकलव्याचा प्रतिसाद वाचून धक्का बसला. अर्थात एकलव्याच्या राजकीय मतांविषयी फारशी माहिती नाही म्हणा.
राजकीय विचार कोणतेही असोत बहुतेक सामान्यजनांची विटंबनेचे आणि नंतरच्या विध्वंसाचे समर्थन बिलकुल नाही अशी सरळसोट भूमिका असेल असा माझा अंदाज आहे. पण त्यावरूनही राजकीय रंग ओळखता येईल ह्याची कमाल वाटते.

एका सामान्य व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस याचा काय संबंध? आणि मीनाताई ठाकरेंचे काय महत्त्व हा प्रश्न अनुत्तरितच आहे. तुमचा आदर वगैरे ठीक आहे, पण ठाकरे घराण्याशी आणि शिवसेनेशी इतक्या वर्षांचा संबंध सहन करण्यापलीकडे त्यांचे काय योगदान हे आमच्यासारख्या बहुसंख्य पूर्वगृहदूषीत लोकांच्या लक्षात येत नाही ना!
मीनाताईंचे महत्व काय हा येथील प्रामाणिक प्रश्न आणि कोण ह्या अशी हेटाळणी अस्थानी आहे इतकाच मुद्दा आहे. शिवसेनेशी इतक्या वर्षांचा संबंध इतकेच त्यांचे योगदान एवढीच माहिती मलाही आहे. पण यदाकदाचित कोणाच्या नजरेत ही भव्यदिव्य कामगिरी नसेल म्हणून त्यांची विटंबना झाली तरी चालेल असे अप्रत्यक्षपणेही येणे मला खटकते.
जिजाऊंची विटंबना झाली तर ते वाईट आणि तुमच्या/माझ्या आईचा अपमान झाला तर चालेल हे साफ अमान्य. इतकेच सांगण्याचा प्रयत्न आहे. बघा पटतंय का!
विटंबना झाल्यानंतर काय करायचे, सार्वजनिक जागी कोणाचे पुतळे असावेत हा स्वतंत्र मुद्दा आहे. आज (कोणाचाही) पुतळा आहे, स्मृती आहेत मग त्यांचे जतन झाले पाहिजे ही माफक अपेक्षा.

पदव्यांच्या मालिकेवरून बुद्धिमत्ता मोजणारे आपण (संजोप राव) नाही असे येथील वावरावरून वाटते. तेंव्हा त्या कदाचित सोप्या ठरणाऱ्या हिशेबात शिरत नाही. पण येथे उगाच हा तथाकथितच बुद्धिबळाचा टेंभा कशासाठी? 
याचा अर्थ आणि संदर्भ दोन्ही लक्षात आले नाही. 

शिवसेनेचा पाया हा blue collar समाजात आहे. पत्रकार आणि काचेच्या मनोऱ्यात राहणारे तथाकथित बुद्धिमान "ह्यांची अक्कल ती काय" अशी हेटाळणी करीत असतात. शिवसेनेच्या -- आणि बऱ्याचदा दलित आंदोलनाच्याही -- बुद्धिमत्तेवर टीका करणे हे काही नवीन नाही.
पण आपण तर बुद्धिमत्ता मोजणारे वाटत नाही. आपल्या शिवसेनेच्या बुद्धिमत्तेवरील हल्ला आणि अप्रत्यक्षपणे आपण कसे बुद्धिमान हे कशासाठी याचा नेमका अर्थ आणि संदर्भ दोन्ही लक्षात न आल्याने येथे उगाच हा टेंभा का अशी विचारणा.
थोडासा मीच संभ्रमात असल्याने कदाचित माझा प्रतिसादही बुचकळ्यात टाकणारा असेल. चूक मान्य!

गुन्हेगारांना कठोरात कठोर आणि तत्काळ धडा शिकविणारी यंत्रणा निर्माण करणे आणि राबविणे हाच तर चांगल्या शासनाचा दाखला आहे.
हे जर इतके साधे आणि सोपे आहे,
साधे आणि सोपे नाहीच हो. पण दुसरा कोणताच मार्ग मला तरी माहीत नाही. आधीच आपण अंशतः सहमत झाल्याप्रमाणे पुतळे, मानचिह्ने, प्रार्थनास्थळे नाहीशीच करणे हा तर नक्कीच उपाय ठरू शकत नाही.

तर सत्तेत असताना शिवसेनेने हे पटकन करून का टाकले नाही बुवा?
शिवसेनाच काय पण ज्या कोणत्या राजकीय पक्षाची या दिशेने वाटचाल दिसेल/दिसते त्याला अनेकांचा पाठिंबा मिळेल. माझे मत नक्की मिळेल.

अवांतर - सन्जोप राव, तुम्ही उभे राहा... कोणत्याही पक्षातून... माझे मत मिळेल तुम्हाला. पण एका अटीवर - मीनाताईंच्या विटंबनेची घटना निंदनीय आहे हे जाहीरपणे मांडा.