गदीमांचे टिळकांवरील खालील काव्य (प्रत्येक शब्द वाचण्याजोगा) आणि त्यातील शेवट चपखल लागू होत आहे...(हा प्रसंग गंगाधर गाडगिळांच्या "दुर्दम्य" मधेही उध्रुत केला आहे)
गिरी सिंहगडावर घेवूनी अल्प विसावा
नरसिंह परतती टिळक आपुल्या गावा
मस्तकी अजूनही होते भूत स्वराज्य
शिवभूप तयांचे धर्माधिष्टीत राज्य
तो कोंडण्याचा लढा त्यातले वीर
ती तानाजीची तडीतप्रभा तलवार
तो हात विदेही तुटूनी संगरी गेला
अन ढाल होवूनी लढला भगवा शेला
परपुष्ट बाड्ग्या राजपुताचा वार
ते वीर कलेवर जिवंत शोणीतधार
ती शेलाराची व्रुद्धयुव्याची मुर्ती
अन सुर्याजीची समरगर्जना स्फ़ुर्ती
'हा बाप रणांगणी पडे मरूनी तुमचा
मग लोभ कशाला तुम्हास तुमच्या तनुचा'
गाजला हराचा विजय कोंद्ला घोष
घुसलेच मराठे रणी पुरे बेहोष...
...बेहोष तयांची चाल घेवूनी पायी
बळवंत पोचले टिळक आपुल्या गेही...
झणी निकटवर्ती जन दबकत पुढ्ती आले,
उग्रता मुखावर पाहून मागे सरले
उघडले कुणीतरी तोंड सांगण्याकरीता
कधी कानी न यावी अशीच होती वार्ता
प्रश्नार्थ स्वारीची भुवई किंचित चड्ली अन आप्त मुखातून निसरून वार्ता पडली
'तडीपार जाहले लालाजी की हाय.."
बोलता शब्द ती वाचा कंपीत होय
अन वीर केसरी टिळकही झाले स्तब्ध
लोचनी परंतू वैश्वानर हो क्षुब्ध
नयनात शतग्नी क्षणी पेटल्या दोन
अन स्फ़ोट्क फ़ुटला वायू श्वासामधून
तोडीता तुटेना बंद बंडीचा घट्ट
संताप दाटला छाती फ़ुगली तट्ट
तोडीले तटातट बंद वरी निश्वास
ओठात उडी घे मनात दबली आस
"का हद्द पार हो देशभक्त तो थोर?"
अन मधे पळाली पळे भयाने चार
उमटला मुखातुनी स्वगतच प्रश्न ज्वलंत
"नांदतो कसा मग मिंटो अजुनी जिवंत?"
मग पुन्हा स्तब्धता तशीच काही काळ
बसवला विवेके काळ स्थळाचा मेळ
मुखी शब्द उमटले अस्फ़ुटसे चुट्पुट्ते
"या दुर्बल देशी कसे अपेक्षू भलते..."