माझं मत याच्या थोडसं विरुद्ध आहे. मागच्या पन्नास साठ वर्षांकडे बघितलं तर उलट असं वाटतं की महायुद्धाची शक्यता दिवसें दिवस कमी कमी होत चालली आहे. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे अमेरिका रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाची समाप्ती आणि दोन्ही जर्मनींचं विलिनीकरण.
दहशतवाढ वाढतोय किंवा अमेरिकेची दादागिरी वाढतीये हे मान्य. पण याचा अर्थ या महायुद्धाच्या खुणा आहेत असं मला नाही वाटत. तसंच म्हटलं तर भारताची आणि चीनची दादागिरी पण (आंतरराष्ट्रीय व्यापारातली) वाढतीये. गोल्ड्मन साख या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्ट्मेन्ट बँकींग (मराठी शब्द?) कंपनीनं केलेल्या एका शोध अभ्यासाचे निष्कर्ष ब्रिक (brazil, russia, india, china) रिपोर्ट या नावानं २००३ साली प्रसिद्ध झालेत. यानुसार २०४० सालपर्यंत हे चार देश जगातल्या महासत्ता बनतील, युरोपीय देशांनाही मागं टाकतील असं म्हटलंय. मागच्या सात आठ वर्षातली भारताची आणि चीनची प्रगती बघितली तर कदाचित २०४० च्याही बरंच आधीच या दोन्ही महासत्ता बनतील यात कोणाला शंका वाटू नये. हा अभ्यास संपूर्ण शास्त्रशुद्ध आहे आणि जगातले सगळे देश या रिपोर्टकडे खूप गंभीर पणे बघतायत. जगाची (विशेषतः अमेरिकेची) आपल्याकडे बघण्याची बदलेली वृत्ती हेही याचं द्योतक आहे.
जगातल्या शिक्षीत लोकांची संख्या जशी वाढतीये, कम्यूनिकेशन तंत्रज्ञान ज्या झपाट्यानं विकसीत होतंय आणि या साऱ्या मुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार ज्या प्रमाणात वाढतोय, ते सारं बघता मला तरी वाटतं महायुद्धाची शक्यता कमी कमी होत चालली आहे.