जुने लेखक/शिक्षणतज्ज्ञ कै. वि. द. घाटे यांचे एक कुठलेतरी पुस्तक आहे त्यात वाचलेली ही गोष्ट -
एखादा अडेलतट्टू माणूस काही केल्या ऐकायला तयार नसेल व आपल्याच मुद्द्यावर हटून बसला असेल तर आमच्याकडे {म्हणजे मध्य प्रदेशात}त्याला म्हणतात "ठीक है, भाई, तुम्हारी मुर्गी की तीन टांगें!". इतके बोलूनही तो वळणावर येत नसेल तर म्हणतात, "जाने दो यार, ये तो बनचुके हैं". आता बनचुके म्हणजे काय तर त्याची एक गोष्ट आहे -
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मग तो एकेक प्राणी बनवू लागला. जवळची माती घ्यायची, तिला आकार द्यायचा, त्यात जरूर ती सुधारणा करायची व शेवटी त्यात प्राण घालून त्याला सोडून द्यायचे.
असे कितीतरी प्राणी बनवून झाले. ईश्वर जरा कंटाळला होता. थोडा विरंगुळा म्हणून त्याने एक मातीचा गोळा घेतला व त्यावर दुसरा एक गोळा असाच चिकटवला. आणखी एक गोळा त्यावर फेकला. आणखी एक्दोन असेच इकडेतिकडे लावले. तयार झालेला विचित्र बेढब आकार पाहून देवाला हसू आले. त्याला क्षणभर वाटले या ओबडधोबड आकारात प्राण घातला तर काय गंमत येईल. त्याने तसे केले. तत्क्षणी तो प्राणी उठून तिरके तिरके पाय टाकत हालत डोलत चालायला लागला व निघून चालला.
ईश्वर त्याला म्हणाला, "अरे बेटा थांब, अजून तू पूर्ण बनवून झालेला नाहीस. मला तुला जरा नीट आणि चांगला आकार देऊ दे. एवढ्यात कुठे चाललास? थांब थोडा इथेच. सगळे ठाकठीक करून देतो, मग जा."
हे काही त्या प्राण्याला पटेना. तो म्हणे "ना-ना, हम तो अब बन चुके!". ईश्वराने किती समजावायचा प्रयत्न केला तरी तो ऐकेना. त्याचे एकच पालुपद - हम तो बनचुके. शेवटी देवाने त्याचा नाद सोडून दिला व म्हणाला, "बरं बाबा जा जगात आणि उंट बन"
यावरून प्रत्यक्ष ईश्वराने समजावूनसुद्धा ज्याची समजूत पटणे अशक्य असते, ज्यामध्ये बदल होणे असंभव, अशा माणसाला "बनचुका" म्हणण्याची प्रथा पडली.
घाट्यांनी सांगितलेला अर्थ वरीलप्रमाणे.

चित्तरंजन, आपल्या मनात काही वेगळा अर्थ असल्यास तोही सांगा, माझ्या ज्ञानात भर.

(बाय द वे, हा शब्द चांगला व अर्थपूर्ण असला तरी नवीन बनवलेला व यशस्वी यादीत बसण्यापैकी वाटत नाही, किंचित असहमतीचा सूर)
दिगम्भा