"वाणीची शुद्धता "हा विचारप्रवृत्त  करणारा विषय आहे. श्री. नीतिन यांनी वैकक्तिक मते विचारली आहेत. तेव्हा हा विषय मला जिव्हाळ्याचा वाटला. कारण मी पेशाने शिक्षक असल्याने वाणी शुद्ध ठेवण्याची काळजी मी घेतेच. त्यातून माझा विषय संस्कृत. त्यामुळे माझे उच्चार शुद्ध होण्यासाठी, तोंडाच्या आतील भाग स्वच्छ ठेवणे शिकवायला जाण्या आधी काही खाणे झाल्यास तोंड स्वच्छ धुऊन एखादी लवंग किंवा वेलचीची बी तोंडात धरणे‌ शब्दांच्या ऱ्हस्वदीर्घतेनुसार उच्चार करणे, ही पथ्ये मी पाळते.       
ही झाली उच्चारशुद्धतेविषयी दक्षता घ्यायची माझी पद्धत. एरवी व्यवहारात अपेक्षित असलली वाणीची शुद्धता ज्यामुळे आपली कामे प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतात या संबंधी बराच ऊहापोह अनेकांच्या प्रतिसादात झाला आहे.                 
वर लिखाळ यांनी मांडलेल्या विधानांचा आशय सांगणारी काही संस्कृत सुभाषिते इथे उद्धृत करत आहे-
१)सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम्।
न असत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः॥
      "बोला सत्य व प्रियही बोला
        अप्रिय सत्य न बोलावे
        असत्य प्रियही बोलु नये"
        हे धर्म सनातन जाणावे.

 

२)शत्रोः अपि गुणाः ग्राह्याः दोषाः वाच्याः गुरोः अपि।
सर्वथा सर्वयत्नेन पुत्रे शिष्ये हितं वदेत्॥
       दोष गुरुचेही सांगावे
         शत्रूचेही गुण घ्यावे
      पुत्राशी अन् शिष्याशी
         सदैव हितकर बोलावे॥
३)प्रिय वाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः।
तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता॥
      जगात सगळे प्रसन्न होती
        ज्यांना जे प्रिय, ते वदता
      म्हणुनि वदावे, ज्याला जे प्रिय
        त्यात कशाला दरिद्रता॥