मंडळी,
सर्व प्रकारच्या प्रतिसादांबद्दल आभार.
'करारावर सही करताना अक्कल पाहिजे होती' किंवा 'करार केला आहात तर तो पाळा' किंवा 'करार तोडणाऱ्या व्यक्तीला कोण जबाबदारीची जागा देईल?' हे सर्व मुद्दे त्यांच्या जागी बरोबर आहेत. पण त्या नाण्यालाही दुसरी बाजू आहे. भारतात किती जणांना कामगार कायद्याबद्दल नीट माहिती असते? नोकरीच्या ऑफर स्विकारताना जर जास्त खोलात जाऊन चौकशी केली तर 'हे सांगायला आम्ही आता बांधिल नाही, तुम्हाला नोकरी स्विकारायची नसल्यास मागे अजून नऊ जण आहेत' अशी किंवा अशा सुरातली उत्तरे दिली जातात. परदेशी पाठवताना तेथील निवास कितपत सोयींनी युक्त आहे याची कल्पना दिली जात नाही. तिथे मिळणार असलेला खर्च तिथल्या मानाने जगायला पुरेसा आहे की आपण दात कोरुन पोट भरुन पुरवायचा आहे याची कल्पना दिली जात नाही. 'ब्लडी कंजूस इंडीयन्स' परदेशी जातात आणि तिथे जगायला भारतातल्या कंपनीने पुरेसा पैसा न दिल्याने परदेशी सहकाऱ्यांबरोबर न जेवता गुपचूप जागेवर खिचडी किंवा पाव बटरचा डबा खातात. खेळ, परदेशी सहकाऱ्यांबरोबर बाहेर जेवणे शक्यतो टाळतात कारण आज जरी त्याने बिल दिले तरी उद्या आपल्याला द्यावे लागेल. प्रसंगी परदेशी सहकाऱ्याबरोबर कँटीनला जावे लागले तर स्वस्तात स्वस्त डिश किंवा फक्त सॅलॅड खातात पोटाचं किंवा भूक कमीचं कारण सांगून. कॉफी चहा शक्यतो कचेरीतच पितात घरचे चहा दूध वाचावे म्हणून. कधी घाऊक दुकानातून मूग स्वस्त मिळाला म्हणून महिनाभर आलटून  पालटून बटाटा आणि मुगाची भाजी बनवून खातात.'फ्वारीन' ला गेलेला माणूस नेहमीच खोऱ्याने पैसे कमावत नाही हे समजू न शकणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांसाठी सेकंडहँड भेटी देणे मनाला पटत नसतानाही सेकंडहँड मार्केटातून वस्तू आणून भेट देतात.सहा महिने/नऊ महिने/एक वर्षे परदेशी असतानाही त्यांना बायकोला बोलावू दिले जात नाही.'बोलावल्यास तिला ५० डॉलर/दिवस वाल्या हाटेलात ठेवा(तुम्ही ठवणार नाही कारण तुमचा प्रतिदिवस पगारच २५ डॉलर आहे..), आम्ही त्यांना निवासात राहू देणार नाही. भारतीय माणसांच्या बायका आम्हाला या निवासात बघायची इच्छा नाही.' हे ऐकून बायकांना 'तू नको येऊस, इथे कंटाळा येईल' समजावतात..

याच गोष्टीला दुसरी बाजूही आहे की करार न केल्यास लोक परस्पर परदेशात दुसऱ्या नोकऱ्या शोधतात. पण माझा प्रश्न असा की करार करणाऱ्यानेच सर्व अटींवर सही करायची? त्या कचेरीतर्फे असे आश्वासन मिळत नाही की तुम्हाला चांगली पगारवाढ मिळेल किंवा इतकी इतकी वर्षे करार आहे तर त्या वर्षात्चा संपूर्ण दिल्या जाणाऱ्या कामांचा आराखडा..कदाचित परदेशी जाऊन आलेल्या माणसाला भारतात कचेरीच्या गरजेनुसार दुसरे काम दिले जाते आणि दिली जाणारी कामे आणि तंत्रज्ञान अर्धे काम झाल्यावर सारखे बदलल्याने करार संपल्यावर पुढच्या नोकरीच्या वेळी 'जॅक ऑफ ऑल, मास्टर ऑफ नन' होऊन अनुभवापेक्षा पुष्कळ कमी पगारावर किंवा नापसंत कामावर पुढची नोकरी स्विकारावी लागते..हा तोटा काहीच नाही? नोकरी पकडताना 'तू चार वर्षाचा करार लिहून दे, तोडलास तर सहा लाख आम्हाला दे, पण आम्ही मात्र मनाला येईल ते काम, मनाला येईल तो पगार तुला देऊ. तुला भारतात कुठेही बदली देऊ.आम्ही जे मनाला येईल ते करु.' असा करार करुन खरी 'लॉयल्टी' मिळते का? की असे कर्मचारी हळूहळू 'सरकारी' बनून त्यांची क्षमता आणि कामाची गुणवत्ता हळूहळू मरत जाते? की 'आता या वर्क प्रोफाईलला नविन नोकरीच नाही' म्हणून असा कर्मचारी बाहेर पडू शकत नाही? असा कर्मचारी आजारी पडल्यास त्याच्याकडून 'हा आजारपणाचा काळ माझ्या करारात नाही आणी तो मी चार वर्षे झाल्यानंतर अजून आजारी पडलेले महिने काम करुन पूर्ण करेन' असे लिहून घेतले जाते.

याला माझ्या शब्दकोषात असलेला शब्द 'वेठबिगारी' हा आहे. आणि करारातला प्रत्येक दिवस माझ्यातला उत्साही कर्मचारी हळूहळू झिजवून मारतो आहे. म्हणूनच मला मनोगतींची मदत हवी आहे. अनुकूल, प्रतिकूल सर्व प्रकारच्या सल्ल्यांचे स्वागत आहे.