सचिन हा महान खेळाडू आहे हे कितीही वादातीत असले तरी, त्याची आक्रमकता आता कमी झाली आहे हे सांगायला कुणा मांजरेकरची गरज नाही. सचिनचा चाहता वर्ग हा चाहता आहे त्याच्या ह्या आक्रमकतेचा. (निदान मी तरी!)
सचिनने शतकं किती ठोकली ह्यापेक्षा अमक्या अमक्या सामन्यात त्याने मॅग्राथ ची कशी जिरवली, शेन वॉर्न ला कसे दिवसा तारे दाखवले, ओलोंगाला त्याची जागा कशी दाखवली ह्या आठवणी जास्त महत्वाच्या आहेत.
माझ्या मते ह्या सगळ्याची सुरुवात झाली सचिन आणि ब्रॅडमन ह्यांच्या ऐतिहासिक भेटीपासून. ब्रॅडमन बाबा ने सचिनला सल्ला दिला की,' ९०-१०० ह्या आकड्यांमध्ये अंतर १० धावांचेच असले तरी करियर च्या दृष्टीने ह्यामधील अंतर १ शतक आणि ० शतक इतके आहे.' झाले ब्रॅडमनचा हा सल्ला शिरोधार्य मानणाऱ्या सचिनची ९०/४५ धावांवर पोहोचला की सुरू होणारी धडपड केविलवाणी वाटते. सांघिक कामगिरी पेक्षा वैयक्तिक कामगिरीला महत्त्व देण्यास इथूनच सुरुवात होते. सामना हरला काय किंवा जिंकला काय..माझ्या नावावर अजून एक शतक लागलं..