वा! झकास लिहिला आहे लेख.

आमच्याकडेही होता सगळ्यांना हा आजार.

माझ्या पपांची आवराआवरी म्हणजे, माळ्यावरुन जुन्यापान्या वस्तू काढणे आणि स्वच्छ पुसून परत जागच्या जागी ठेवणे! आमच्या घरात केवळ वस्तू येतात... बाहेर जात नाहीत. यावर आता माझा ठाम विश्वास बसला आहे.

पसारा काढला, की आमच्या घरात दोन पक्ष तयार व्हायचे. माझा आणि बहिणीचा आधुनिक विचारसरणीचा पुरोगामी पक्ष. आणि आई, पपांचा गाठोड्यांमधील विचारांचा प्रतिगामी पक्ष. न लागणाऱ्या जुन्यापान्या कपड्यांनी कॉट भरायची. आम्ही गंजलेली शेगडी, अनेक वर्षे न वापरलेलं घंगाळ टाकून देऊ असं म्हंटलं की, "टाकून द्या काय? पैसे पडतात प्रत्येक वस्तूला" किंवा "तुम्ही संसाराला लागला की बघू काय काय फेकून देता ते" अशी वाक्ये आई ऐकवायची. "अजून कमवायची अक्कल नाही आणि चाललेत फेकाफेकी करायला" या वाक्याचा तर नकाराधिकारासारखा हुकमी वापर व्हायचा.

मागे एकदा घर बदलताना कधी नव्हे ते आईने बऱ्याच वस्तू  भंगार म्हणून जुन्या घरात तशाच टाकून दिल्या. निघताना पपांनी भराभरा त्या कधी पोत्यात भरल्या कुणाला कळलंही नाही!

शोकेसवरचा ढीग कोण कमी करतो आणि कोण वाढवतो अशी माझी आणि पपांची स्पर्धा चालायची. शेवटी मी माघार घेतली आणि त्या ढिगाला मान्यता देऊन टाकली.

कधी काळी मीही माझ्या संगणकाला केवळ आंघोळ घालणेच बाकी ठेवायचो...

आजकाल खुर्चीवर बसायचे असेल तर खुर्चीवरचा पसारा दिवाणवर टाकतो आणि झोपायचे असेल तर तोच पसारा परत.......

संगणकाचा पडदा दिसण्यासाठीसुद्धा हल्ली दोनचार वस्तू बाजूला कराव्या लागतात. :)

सध्यातरी आम्ही सर्व ह्या आजारातून मुक्त झालोय. त्यामुळे आम्ही आणि आमच्या घरातील सर्व वस्तू, आता सुखासमाधानाने नांदत आहोत.

 

उतू नका मातू नका, घेतल्या वस्तू टाकू नका.