शिरीष कणेकर यांच्या 'यादोंकी बारात' मधून उद्धृत-

नरड्याला अवघड हा शब्द मान्य नाही आणि अशक्य हा शब्द ऐकलेलाच नाही. भजनापासून कव्वालीपर्यंत, गझलेपासून गीतापर्यंत, लाइट क्लासिकल पासून शब्दविभ्रम करणाऱ्या चावट गीतांपर्यंत काय वाट्टेल ते गायला सांगा ना.

रफीची गाणी सांगत बसणे म्हणजे धान्याच्या कोठारातला एकेक दाणा मोजत बसण्यासारखे आहे. ज्याच्याकडे रफी गायला असा हिंदीत संगीतकार नसेल. गुलाम हैदरपासून आर. डी. बर्मनपर्यंत सर्वांच्या रेकॉर्डिंग रूममधून तो सुगंधासारखा दरवळलाय. हेमंतकुमार आणि सी. रामचंद्र या गायक संगीतकारांनीही त्याला गायला लावलं. 'शहाजहान'मध्ये तो सैगलबरोबर गायला होता.

रफिक गझनवी आणि पंडित गोविंदराम यांचं संगीत असलेल्या 'लैला-मजनू'त खान मस्ताना प्रमुख गायक आणि रफी कोरसमध्ये होता. आसिफच्या अपुऱ्या राहिलेल्या 'लैला-मजनू'त परिस्थिती बरोबर उलटी झाली होती. रफी प्रमुख गायक होता व अर्धांगवायू झालेला खान मस्ताना कोरसमध्ये उभा होता.

मध्यंतरी एक काळ तर असा होता की, रफीशी मतभेद झाल्यावर लतानं त्याच्याबरोबर गाणं बंद केलं असता काही संगीतकारांनी द्वंद्वगीतासाठी रफीला राखलं आणि साक्षात लताला बाजूला सारलं!

नायकासाठी, उपनायकासाठी, विनोदी नटासाठी व भिकाऱ्यासाठीही तोच गायचा.