ऋग्वेदाची आणखी एका प्रकारे विभागणी केलेली आहे. त्यात अष्टक, अध्याय, वर्ग, मंत्र अशा प्रकारची विभागणी आहे पण ती ऋग्वेद पाठांतराच्या दृष्टीने सोयीची होती. पण संदर्भ दृष्टीने मंडळ, सूक्त, मंत्र हे विभाजन जास्त सोयीचे वाटत असावे. तसे पाहतां बर्याच ग्रंथांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विभागणी केलेली दिसते. रामायणात कांड, सर्ग, श्लोक म्हणतात, महाभारतात कांडाच्या ठिकाणी पर्व हा शब्द वापरलेला दिसतो, भागवतात स्कंध, अध्याय, श्लोक दिसतात, योगवसिष्टामध्ये प्रकरण, सर्ग व श्लोक आहेत, दासबोधात दशक आणि समास दिसतात. उपनिषदांत कांही ठिकाणी विभाजनाचे वेळी खंड, अध्याय, वल्ली, ब्राह्मण असे शब्द वापरले आहेत. पण हे सर्व असे कां ? मी फक्त एवढेच म्हणू शकतो - मला माहित नाही.
ऋचांना 'श्लोक' व सूक्तांना 'स्तोत्र' म्हणण्यांत मला तर कांहीच वावगे दिसत नाही. पण ऋचा म्हटले की ऋग्वेद, कवन म्हटले की यजुर्वेद, तसेच ज्ञानेश्वरीची ती ओवी, दासबोधाचा श्लोक, मोरोपंतांची ती आर्या हे समीकरण वा प्रथा पडलेली दिसते.
मूर्त अमूर्त हे शब्द लेखात ढोबळ मानाने वापरलेले आहेत. मूर्त म्हणजे ज्याची मुर्ति बनवता येईल (मग ती 1000 फूट उंचीची का असेना पण मर्यादित स्वरूपाची) अशा अर्थाने मी हा शब्द वापरलाय. ह्या हिशोबाने उगवणारी उषा, वाहणारा वायु, अंतरिक्षांतील सूर्य हे अमूर्त. तसेच अजर हा शब्द जरारहित (वृद्धत्व), अमर म्हणजे मृत्युरहित ह्या अर्थाने वापरलेले हे शब्द. मर्त्य म्हणजे जन्म मृत्यु असलेले. राम, कृष्ण हे तर मर्त्य मानव योनीतले देव. पण त्यांना कोणी मर्त्य म्हणेल तर त्याला लोक लगेच हा नास्तिक आहे असेच म्हणतील. पण विठोबा (पंढरपूर), बालाजी (तिरुपती), कैलासपति महादेव ह्यांचा जन्म झालेला कुठे ऐकला नाही. पण ते तर मूर्त स्वरूपात भजले जातात. कोण मूर्त कोण मर्त्य ह्यांचे अर्थ देखील साधकाची जशी वैयक्तिक प्रगति व श्रद्धा विकास होत असेल त्याप्रमाणे बदलत असतील असे मला तरी वाटते. आता माझ्या दृष्टीने ज्याला नाम व रूप आहे, ज्याची शब्दात व्याख्या करता येते, ज्याला आयुष्य मर्यादा आहे ते सर्व मूर्त व मर्त्य. ब्रह्मदेवालाही ठराविक (काही अब्ज वर्षे) आयुष्य आहे. भगद्गीतेत (8.16) मध्ये त्यालाही 'पुनरावर्तिनो' असे म्हटले आहे.
देव ही संकल्पना ' पुल्लींगी ' मुळीच नाही. खरे तर ती नपुसकलिंगी आहे. पहाटे उठून उगवणारा तो सूर्य आणि त्या आधी येणारी ती उषा ह्याचे अवलोकन केल्यास दिसून येईल की इथे तो आणि ती हे भाषा, व व्याकरण (comminication) च्या दृष्टीने केलेले सोयीचे शब्द आहेत. देव हे भाषा आणि व्याकरण निर्मितीच्याही आधीचे आहेत. ग्रामीण भागातल्या बायका बर्याच वेळा मी आलो मी गेलो म्हणतात म्हणून त्या लगेच पुल्लींगी होत नाहीत ना ? तसेच हे.
स्त्री पुरुष (कृत) असा भेद करण्यापेक्षा आपण जर बघितले की भाषाकारांनी फार महत्वाचे शब्द - जसे मातृ, तुष्टि, दया, स्मृति, वृत्ति, कांति, किर्ति, श्रद्धा, शांति, क्षांति, शक्ति, छाया, बुद्धि, निद्रा, चेतना - ही सर्व नांवे स्त्रीलिंगी ठेवली आहेत. का तशा अर्थांए त्यांना पुल्लींगी शब्द सुचले नसते ? पण ह्या सर्व महान गोष्टींना स्त्रीलिंगी शब्द आहेत म्हणजेच ' स्त्री ' बद्दल किती आदराची भावना होती हेच मला तरी जाणवते.
उत्तर कितपत acceptable आहे माहित नाही, पण राधिकेने दाखविलेला विश्वास सुखावणारा आहे (स्तुति कोणाला प्रिय नाही म्हणा) . असो. एकदोन दिवसांत 'देवी अथर्वशीर्ष' (वा देवी उपनिषत्) देतो म्हणजे देवी व परब्रह्म ह्यांत भेद नाही हे दिसून येईलच, व वैष्णव,शैव उपासक आहेत तसेच देवी उपासकही बरेच असतात हे दिसून हेईल.