कविता किंवा इतर कोणत्याही लेखनप्रकारात प्रस्तुतकर्त्याच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. जे वाटेल ते व्यक्त करण्याचा अधिकार कुणीही नाकारू शकत नाही. त्याला विरोधच करायची झाला तर विरोधकर्त्याची 'मी याच्याशी सहमत नाही'अशीच भूमिका असावी. कवितेतील जजमेंटल भूमिकेवर टीका करताना आपण स्वतःच जजमेंटल होत नाही ना याचे टीकाकारांनी भान ठेवावे.
सरळ, साधे व्यसनमुक्त आयुष्य जगण्यावर टीका करण्याचा या कवितेचा उद्देश आहे असा अर्थ काढण्यामागचे लॉजिक कळत नाही. अहो, तुम्हाला जगायचे तसे जगा ना! पण या कवितेतला पंच आहे तिच्या शेवटात. आपण सार्थ वगैरे तर सोडाच, पण नुसते जगलो म्हणजे काय केले हे जर सांगता येत नसेल तर ते जगणे वायफळच म्हणायचे. स्कॉच, सिग्रेट, मटण या सर्वसंमत, कदाचित उथळ पण प्रातिनिधिक आनंदाच्या कल्पना आहेत. यापासून संपूर्ण विरक्त, भस्माचे पट्टे ओढलेले तरीही अर्थपूर्ण आयुष्य जगणे शक्य असेलही, पण तेच आपल्या आयुष्याचे सार आहे याची जाणीवतरी हवी. 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' ची रद्दी ही एक सांकेतिक मानसिकता आहे. ती कळण्यासाठी कविता समजण्याचे किमान ज्ञान हवे. ते नसेल तर ही कविता लोकांनी दारू प्यावी, सिग्रेटी ओढाव्या, मटण खावे असा प्रचार करणारी आहे, असा बालीश अर्थ काढता येईल. चौपाटीवर जाऊन पाणीपुरी न खाणे, सतत गरम पाण्याचा थर्मास बाळगणे, जाग्रणे सोसत नाहीत म्हणून गाण्याचे कार्यक्रम, सिनेमे न बघणे, सतत सावधगिरीची घाबरट, क्वचित भेकड भूमिका घेणे आणि शेवटी आपल्या पोकळ आयुष्याला कृतार्थ वगैरे म्हणणे या वृत्तीवर केलेले हे भाष्य आहे. त्यातला शब्दशः अर्थ घेणे आणि त्यावर स्वतःच न्यायाधीशी पवित्रा घेऊन कांगावा करणे हे या कवितेत उल्लेख न केलेले कृतार्थ आयुष्याचेच एक लक्षण.

आजच्या भोगवादी संस्कृतीप्रमाणे न वागणारी, आपला संसार,जबाबदाऱ्या आपल्या कुवतीप्रमाणे पार पाडणारी माणसे या कवीला  'बावळट' वाटतात
हा अर्थ प्रतिसाद देणाऱ्यांनी स्वतःच्या मगदुरानुसार काढला असून तो मला अजिबात अभिप्रेत नसल्याने त्यावर भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही.