"सासु आणि सून यांच नातं कधीच प्रेमळ, शांतीच असु शकत नाही कां?"

 माझं मत - असू शकते, मी अनुभवलं आहे आणि पाहिलंही आहे..  पण त्यासाठी दोन्ही बाजूंनी समजुतीने घेणे आवश्यक असते.   तुमच्या लिखाणावरून तुम्हाला स्वतःला त्रास होतो आहे असं वाटते, कदाचित जवळच्या एखाद्या व्यक्तीलाही होत असेल..  पण अश्या त्रासांचे बहुतेक अपेक्षाभंग हेच कारण असते.  तुमच्या सासू/सून म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा काय आहेत ह्याचा शोध घेतलात तर त्यावर मध्यम मार्ग काढता येऊ शकतो.  घरातल्या विसंवादांची कारणं म्हणजे घरातली कामं, रितीरिवाज, मालकीहक्क हे काही नेहमीचे प्रश्न.  ह्या सर्वावर सगळ्या कुटुंबांना एकच नियम लागू करता येणार नाही.  पण घरातल्या प्रश्नांवर एकत्र मोकळेपणी चर्चा करणे आणि सर्वांना घरगुती अडचणींची जाणीव (जाणीवपूर्वक) करून देणे हे महत्त्वाचे असते.   याला तुमचे प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी म्हणता येईल.

अजून एक - बऱ्याचदा आपण मित्र-मैत्रिणींशी होणारे विसंवाद नजरेआड करतो, कारण त्यांची मैत्री आपल्याला हवीहवीशी असते.   तसाच नातेसंबंधांबद्दल विचार केला, तर झालेल्या अपेक्षाभंगांची तीव्रता कमी होऊ शकते.  अर्थात त्रास होत असताना ते सहन करण्यापेक्षा असे सल्ले देणं सोपं आहे हे मला कळतं. 

तरीही कामाच्या ठिकाणी असो, मैत्रिणींबरोबर असो किंवा घरच्या मंडळींबरोबर असो, जर स्वतःकडे आपल्यावर सतत काही अन्याय होतो आहे हा विचार बाजूला ठेवला, तर आपण आयुष्य बऱ्यापैकी आनंदाने घालवू शकतो - अर्थात होणारा त्रास तुमच्या लेखी अतितीव्र मानसिक /शारिरीक अश्या प्रकारांत मोडत नसल्यास ..  त्रासाचे स्वरूप तीव्र असल्यास  मात्र इतर विश्वासार्ह व्यक्तींची मदत घेणं चांगलं.   किंवा अश्या नातेसंबंधांपासून दूर राहणे चांगले. 

पण सर्वसामान्य घरांमध्ये पूर्ण न झालेल्या अपेक्षा आणि  गैरसमज, घरच्यांची आपल्याला वाटलेली अन्यायकारक वागणूक यांमुळे आपले चार सुखाचे क्षणही आपण गमावून बसतो.  हे टाळायला आपण आपली मतं (सभ्य शब्दांत) वेळच्यावेळी सांगितलीत, घरातल्या सर्वांना मोकळेपणाने आपल्या अपेक्षाही बोलून दाखवल्यात तर त्या गोष्टींचा/ त्यापासून होणाऱ्या त्रासांचा वेळीच निचरा होऊन जातो, आणि होणारे त्रास सर्वांनाच कमी होतात.  सर्वात मुख्य म्हणजे स्वतःकडे बघताना आपण पिडित आहोत ही मनाला दुःखी करणारी भावना निघून गेल्याने सगळ्या घरालाच त्याचा फायदा होतो.  हे काहीच शक्य नसल्यास, दूर राहणे चांगले.  यावरून मी लहानपणी ऐकलेली एक म्हण आठवली - "मध्ये असे लोड - तर तुम्ही आम्ही गोड"

सुहासिनी