मी गणेशोत्सव घरीच साजरा करत असल्याने मला तो आवडतो. मंगल वाटते. देवांच्या बाबतीत असे बोलू नये, पण मूर्ती,डोळे, एकंदरीत स्वरुप यावरुन श्रीगणेश इतर देवादिकांपेक्षा जास्त 'आपला' आणि 'फ्रेंडली' भासतो. आरत्या, पूजा आणि अर्थातच मोदक हे सर्व आवडते.
सार्वजनिक उत्सवाबद्दल म्हणावे तर या काळात कोंडी झालेले रस्ते, भयानक आवाजात लावलेली हिमेश साहेबांची व इतर जनांची 'रिमिक्स', मिरवणूकीच्या वेळी चौकात फोडले जाणारे आणि वाहने चालवणाऱ्यांना दचकवणारे फटाके, रस्त्यांवर बागेत चालल्यासारखी मधून चालणारी तरुण फुलपाखरं, समोर दुचाक्या वेड्यावाकड्या उभ्या करुन कट्ट्यांवर बसून टवाळक्या करणारे 'स्वयं' सेवक, विसर्जनानंतर पाण्यात तरंगणारा फुलांचा आणि फुले ठेवलेल्या प्लॅ. पि. चा,हळदीकुंकवाचा, गुलालाचा कचरा याचा मनापासून राग येतो. विदेशात मंडळी पण कार्निव्हल आदी मध्ये मिरवणूकी काढून मजा करत असली तरी ती बऱ्यापैकी शिस्तबद्ध आणि जास्त वाहतूकीचे रस्ते टाळून असतात. मुळात उत्सव आनंद म्हणून साजरा केला तरी चौकाचौकात अवाढव्य देखावे, लायटिंग, फलाण्या गणपतीचा वारेमाप खर्च आणि वेळ घालवून केलेला सोन्याचांदीचा देखावा, फटाके आणि जास्तीत जास्त ध्वनिवर्धकांवर होणारा अवास्तव खर्च तरी टाळावा असे वाटते.