बायबल हा पाचवा वेद आणि अल्ला हा आणखी एक देव हे ही स्वीकारताना न अवघडणारी मने

असं कोण म्हणतं? राजकीय घोषणा म्हणून ही विधानं ठीक आहेत, पण प्रत्यक्षात कोणता हिंदू असं प्रामाणिकपणे मानतो? आणि का मानावं?

बायबल हा पाचवा वेद किंवा अल्ला हा आणखी एक देव असं मी तरी मानत नाही. (तरी मी स्वतःला कट्टर हिंदू समजत नाही.) आणि असं जरी स्वतः मानलं नाही, तरी 'इतरांना बायबल किंवा अल्लाबद्दल आदर असू शकतो' हे मी समजू शकतो, आणि 'त्याच्या आड मी येऊ नये' हेही. जोपर्यंत मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आड दुसरा कोणी येत नाही (मग तो ख्रिस्ती असो की मुस्लिम असो की हिंदू - आणि हिंदू हिंदूंच्या आड येऊ शकत नाहीत हेही तितकंसं खरं नाही!), तोपर्यंत त्या दुसऱ्याच्या विश्वासाच्या आड येण्याचं कारण मला दिसत नाही. मी (हिंदू असूनसुद्धा) बायबलला पाचवा वेद किंवा अल्लाला आणखी एक देव मानतो, म्हणून नव्हे! तसं मानण्याची मला गरज वाटत नाही. किंबहुना, स्पष्टच सांगायचं झालं तर तो अतिरेकी मूर्खपणा वाटतो.

"तू हिंदू आहेस असे ठसविण्याचा" आईवडीलांनी कधीच न केलेला प्रयत्न

कदाचित. (वैयक्तिकरीत्या कित्येकांच्या बाबतीत हे खरं असेलही. सांघिकरीत्या [श्लेष अभिप्रेत] हे कितपत खरं आहे याबद्दल शंका आहे. पण ते जाऊद्या.) पण आज्यांनी "तू ब्राह्मण आहेस" हे ठसवण्याचे कित्येक प्रयत्न केले, त्याचं काय? (एखाद्या लहान मुलाला) साधं कोणी प्रेमानं (त्याला आवडतं म्हणून) चिकन किंवा मासे खायला बोलावलं, तर 'त्यांना सांग, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही असलं खात नाही!' हे (त्या मुलाला) का ऐकायला मिळावं? घरातल्या नातसुनेला ब्राह्मणेतर शेजारणीकडून हळदीकुंकवाचं बोलावणं आलं, की परत घरी आल्यावर 'त्यांचं घर स्वच्छ होतं का गं?' असले प्रश्न (कुतूहलानं का होईना) का विचारले जावेत?
(हे फक्त ब्राह्मणांतच होत असेल असं म्हणायचं नाही, पण अनुभवाअभावी याउपर बोलू शकत नाही.)

किंबहुना आपली ओळख 'हिंदू' अशी कधीच नव्हती, तर जातिनिहाय होती. मग आपण आपल्याला 'हिंदू' (राजकीयदृष्ट्या सोडा!) मानलंच नाही, तर तसं ठसवलं नाही, यात विशेष ते काय?

बाकीचे मुद्दे बरेचसे ठीक वाटतात, पण तरीही त्यात हिंदुधर्माचं वैशिष्ट्य असं म्हणण्यासारखं काय आहे, ते कळलं नाही. म्हणजे, बाकीच्या मुद्द्यांतल्या बऱ्याचश्या गोष्टी चांगल्या/थोर/अभिमानास्पद आहेत, नाहीत असं नाही (जसं ज्ञानेश्वरी, संतपरंपरा, शिवाजीमहाराज वगैरे), पण यात धर्माचं वैशिष्ट्य म्हणण्यासारखं काही वाटत नाही. फार तर प्रादेशिक/स्थानिक वैशिष्ट्यं किंवा व्यक्तिविशेष म्हणता येईल.

हिंदूमध्ये चांगले काय ह्याचा विचार करताना जातीपातीच्या भूतकाळाबद्दलची लाज आणि चीड आगडोंबीसारखी सहजपणे उमटावी अशी घडलेली आमची मानसिकता

हाही मुद्दा पटला नाही. ही मानसिकता धर्मामुळे घडली आहे असं वाटत नाही. किंबहुना अशी मानसिकता ही फार तर गेल्या शंभरसवाशे वर्षांत (कदाचित कमीच!) रुजू लागली असावी. (तीही, नक्की माहीत नाही, पण कदाचित काही अंशी समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे.) कित्येक सहस्रकं जुन्या, तितक्या पूर्वापार चालत आलेल्या धर्माला याचं श्रेय देणं सयुक्तिक वाटत नाही. (हिंदू धर्म जर हजारो वर्षं जुना आहे, आणि ही मानसिकता जर हिंदू धर्मामुळे घडली, तर ती काही हजार वर्षांपूर्वी कशी घडली नाही?)

- टग्या.