दोन्ही श्लोक एकदम घेतले तर भक्ताच्या मनांत कां गोंधळ असतो हे जरा जास्त स्पष्ट दिसेल.  मला वाटते प्रत्येक क्रियेच्या विधिमध्ये थोडाफार देश काल परत्त्वे  फरक असतोच.  म्हणून वाटते की माझ्या हातून काही कमीजास्त (अर्थात् उणीव)  तर झाले नाही ना ? म्हणून दुसऱ्या श्लोकात प्रार्थना आहे की हे गणराया (गणपतिच्या संदर्भात) मी विधिवत् (उच्चारानुसार इ.) मंत्र म्हटले की नाही हे जाणत नाही, सर्व उपचार (क्रिया) व्यवस्थित केल्या की नाही हे जाणत नाही, ज्या भक्तिभावाने मी पूजा केली ती शुद्ध आहे की नाही हे मी जाणत नाही, तरीही मी जे काय केलेय ते परिपूर्ण मानून तू त्याचे सेवन कर. जो पर्यंत भगवंत म्हणजे परमात्मा आणि मी म्हणजे जीवात्मा हा भेद आहे तो पर्यंत अशा प्रकारच्या प्रार्थना असणार हे माझे मत. पण साधना करीत करीत एकदा अद्वैत नाहीसे झाले, आत्मज्ञान झाले की मग त्याला " किमहं साधु नाकरवम् , किमहं पापं अकरवम्  " (तैत्ति. उप)  - कां मी श्रेष्ठ कर्मे केली नाहीत, कां मी पापकर्म करीत राहिलो - असे प्रश्न पडत नाहीत. आता विषय वाढवलाच आहे तेव्हां पुढची स्थितीही सांगून टाकतो. 
        तरीपण पूर्णतेला पावलेला असा भक्तही भक्तिची क्रिया करीतच असतो. कशासाठी ? दुजा कोणी असल्याशिवाय एकटे कुणालाही चैन पडत नाही. (भगवंताला सुद्धा चैन पडले नाही म्हणून तर त्याने आपल्या लीलेसाठी विश्व निर्माण केले). मग अद्वैत जाणलेला भक्त काय करतो ?
        कीं भक्तिसुखालागी  ।  आपणपेंचि दोही भागी  । 
             वांटूनियां आंगी  ।  सेवकै बाणे  ॥ ज्ञा. १२.१८८ ॥ 
        येरा नाम मी ठेवी  ।  मग भजती वोज बरवी  ।
             न भज तया दावी  ।  योगिया जो  ॥ १८९ ॥
भक्तिसुखापासून मिळणारा आनंद लुटण्याकरिता आपणच आपली दो मध्ये वाटणी करतो. एकाकडे सेवकत्व ठेवतो आणि दुसऱ्याला 'देव' म्हणतो. आणि मग जे भक्ति (भजन, पूजा-अर्चा इ. क्रियेद्वारे) करीत नाहीत अशा लोकांना भक्ति चे आचरण करून दाखवितो.
         कोर्डे साहेब, माफ करा जरा जास्तच लिहिले आहे. पण काय करणार - आपण संधि उपलब्ध करून दिलीत आणि जे share करावे वाटले ते उतरले. अधात्म्यातले काही सांगण्याच्या उद्देशाने असा कोणी कृपया समज करून घेऊ नये.