न्यूटनच्या टाळक्यात सफरचंद पडण्याच्या आधी गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू नव्हता, अशातला भाग नाही. (त्याआधीची सफरचंदे हवेत तरंगत नसत.)

किंवा, गॅलिलिओ चर्चच्या छळामुळे मरतामरता म्हणालाच, की "मी पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणालो काय, किंवा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो म्हणालो काय, पृथ्वी सूर्याभोवती फिरायची काही थांबणार नाही आहे. तेव्हा तुम्ही सांगाल, तसं मी म्हणतो - छळू नका!" (डिस्क्लेमर: सांगीवांगीची गोष्ट. पडताळून पाहिलेली नाही. गॅलिलिओचे शब्दशः उद्धरण नाही.) अर्थात, गॅलिलिओने सांगण्यापूर्वीही (चर्च कितीही सांगत असले तरी, आणि आपल्याला कितीही याउलट भासले तरी) पृथ्वी सूर्याभोवती फिरत होतीच, गॅलिलिओच्या सांगण्यामुळे हा फरक पडला नाही.

न्यूटनचा किंवा गॅलिलिओचा मोठेपणा एवढाच, की या लोकांनी या घटनांचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीने ही तत्त्वे मांडली.

इतरांनी जगात इतर ठिकाणी ही तत्त्वे स्वतंत्रपणे शोधून काढली नसतीलच, किंवा ती मांडली नसतीलच, असे नाही. पण त्यामुळे न्यूटनचे, गॅलिलिओचे किंवा आर्किमिडीजचे मोठेपण कमी होत नाही. उलटपक्षी न्यूटन, गॅलिलिओ किंवा आर्किमिडीजमुळे या 'इतरां'चेही मोठेपण कमी होत नाही. हे 'इतर' जर आपल्या संस्कृतीतले असले, तर त्यांचे contribution आपण विसरलो, हा आपला करंटेपणा आहे; पण त्यातून न्यूटनादि थोर नाहीत, किंवा हे 'इतर' अधिक थोर, किंवा न्यूटनादींनी या 'इतरां'चे संशोधन चोरले, किंवा ('व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' सारखे) 'सर्व काही आपल्या संस्कृतीत अगोदरच सांगितलेले आहे, बाकीचे केवळ कॉपी मारतात' यांसारखे निष्कर्ष खचितच निघत नाहीत.

काही चांगली तत्त्वे (कोणती ती तज्ज्ञांनी शोधून सांगावीत!) बहुधा सर्व धर्मांत सारखी असावीत. ("तुम्हीं कांहीं म्हणां, उस्मानशेंठ, सर्व धर्म सारखेंच - आमलेट!" हे पु.लं.च्या "म्हैस"मधले उद्धरण देण्याचा मोह अनावर झाल्याबद्दल क्षमस्व!) आता हे धर्म जर जगाच्या वेगवेगळ्या भागांत स्थापन झाले असतील, तर 'अमूक‌अमूक तत्त्व अमक्या धर्माने अमक्या धर्माकडून चोरले' असे म्हणण्यात कितीसा शहाणपणा आहे? (अर्थात, काही धर्मांच्या परस्परसंबंधांमुळे किंवा एकमेकांमधील उगमांमुळे - जसे ज्यूधर्म-ख्रिस्तीधर्म-इस्लाम किंवा हिंदुधर्म-बौद्धधर्म - काही इकडची तत्त्वे तिकडे आणि तिकडची इकडे होणारच, पण परस्परांशी संबंध नसलेल्या धर्मांत स्वतंत्रपणे एकाच प्रकारचा विचार असणे अगदीच अशक्य नाही.) त्यातून देव-प्रेषित-देवाचा निरोप वगैरे कल्पना जर मानायचीच झाली, तर देव वेगवेगळ्या प्रेषितांद्वारे तोच संदेश वेगवेगळ्या लोकांना देऊ शकत नाही का? मग 'याने त्याचे चोरले' किंवा 'हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ' म्हणण्यात काय अर्थ आहे?

शेवटी 'झाडावरून तुटलेले सफरचंद खालीच पडते' किंवा 'गुरुत्वाकर्षणामुळे दोन पदार्थ इतक्याइतक्या बलाने एकमेकांकडे ओढले जातात' हे महत्त्वाचे. न्यूटनने सांगितले की आणखी कोणी, हे दुय्यम आहे. आणि 'झाडावरून तुटणाऱ्या सफरचंदावरून' generalize करून 'दोन पदार्थांमधील गुरुत्वाकर्षण' आणि त्यांचे नेमके परिमाण यांचा संबंध न्यूटनने जर अभ्यासाअंती लावला असेल, तर यात न्यूटनची थोरवी निश्चितच आहे. हिंदुस्थानात (किंवा अन्यत्र कोठेही) नेमका असाच अभ्यास जर कोणी स्वतंत्रपणे केला असेल, तर तोही तितकाच थोर. मात्र असे खरोखरीच असेल, तर पुढे नेमकी कोठे माशी शिंकली, यावर आपण पुढे build का करू शकलो नाही, हा खरा प्रश्न आहे. 'पूर्वी आम्ही थोर होतो'ला फारसा अर्थ नाही. 'आज आम्ही का थोर नाही', 'ही थोरवी आम्ही टिकवू का शकलो नाही' किंवा 'आज थोर होण्यासाठी यापुढे काय करावे लागेल' हे महत्त्वाचे प्रश्न आहे. 'पूर्वी आम्ही थोर होतो'चे महत्त्व हे अशासारखे प्रश्न आपल्याला त्यातून पडावेत आणि आजही (पुन्हा) थोर बनण्यासाठी योग्य पावले उचलण्याची त्यातून आपण स्फूर्ती घ्यावी, एवढ्यापुरते मर्यादित आहे.

'इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊनि ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा'

अशी काहीशी विंदांची (?) कविता शाळेत असताना शिकल्याचे अंधुकसे स्मरते...

(शाळेत शिकलेले काय आणि कधी उपयोगी येईल - विशेषतः तोंडावर फेकायला - सांगवत नाही. म्हणून प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे!)