शिवरायांचे स्मारक म्हणजे प्रेरणास्त्रोत असा विचार करणारे किती लोक आहेत? सणासुदीला पाण्याचे फवारे मारून साफ करण्याची आणि खोट्या भक्तीने गळा दाटून आणून हार घालण्याची आणि एरवी कावळ्यांनी शिटण्याची जागा असेच या स्मारकाचे स्वरूप असेल तर अशा स्मारकांच्या उभारणीला विरोध असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांनी इमानाने भरलेला कर अशा मार्गाने खर्च करण्याचा शासनाला काय अधिकार आहे?
भूतकाळात अडकून पडणे हा मराठी माणसाचा दुर्गुण आहे काय अशी चर्चा मी मनोगत वर पूर्वी सुरू केली होती. आपले स्मरणरंजन किती लांबणार हा खरा मुद्दा आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून विदर्भातल्या आत्महत्त्यांपर्यंतचे मुद्दे ऐरणीवर असताना 'स्मारके बांधा, आपल्या जाज्वल्य इतिहासाचे धगधगते स्मरण ठेवा, आपला धर्म आणि संस्कृती सांभाळा' असे ढोल बडवत रहाणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करत रहाण्यातला प्रकार आहे.
परदेशस्थ असताना असे राष्ट्रप्रेमाचे उमाळे जरा जास्तच येतात, हे अगदी नैसर्गिक आहे (हे मी स्वानुभवावरून सांगतो). पण कुठेतरी तारतम्यही ठेवले पाहिजे, नाही का?