शिवरायांचे स्मारक म्हणजे प्रेरणास्त्रोत असा विचार करणारे किती लोक आहेत?
बहुमताने आहेत किंवा नाही ह्याची कल्पना नाही. मात्र दुर्लक्षित करण्याइतकेही नसावेत. चिरस्थायी आणि सार्थ असे स्मारक उभे राहील ही आशा त्यामुळेच मनात जागी राहते.

सणासुदीला पाण्याचे फवारे मारून साफ करण्याची आणि खोट्या भक्तीने गळा दाटून आणून हार घालण्याची आणि एरवी कावळ्यांनी शिटण्याची जागा असेच या स्मारकाचे स्वरूप असेल तर अशा स्मारकांच्या उभारणीला विरोध असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांनी इमानाने भरलेला कर अशा मार्गाने खर्च करण्याचा शासनाला काय अधिकार आहे?
केवळ पुतळ्यांच्या स्वरूपातील स्मारक असेल तर तो अनाठायी खर्च हे सूत्र मान्य होऊ शकते. शिवरायांना समर्पक असे स्मारक नेमके कसे असावे यावर वादविवाद करत बसता येऊ शकते... किंवा माझ्या आधीच्या प्रतिसादात सुचविल्याप्रमाणे काही वाटचालही करता येऊ शकते.
वैद्यांनी सुचविले तसे संकेतस्थळ किंवा तत्सम अन्य मार्गही खुले आहेतच.

भूतकाळात अडकून पडणे हा मराठी माणसाचा दुर्गुण आहे काय अशी चर्चा मी मनोगत वर पूर्वी सुरू केली होती. आपले स्मरणरंजन किती लांबणार हा खरा मुद्दा आहे.
चर्चाप्रस्ताव "जाज्वल्य इतिहासाच्या" हेळसांडीविषयी आहे. स्मरणरंजन हा तसा जवळचा विषय असला तरी त्या दोषाची येथे सांगड घालणे हे गल्लत करण्यासारखे वाटते.
खरे तर मराठी आणि भारतीयही माणसाला इतिहास जपणे हे परदेशातून शिकावे असेही आहे. भविष्यकाळावर नजर न हटवू देता इतिहासकाळाचे पुढील पिढ्यांसाठी जतन करणे हे इंग्लंड-अमेरिकेपासून नक्कीच शिकण्यासारखे आहे.
(मी कोठे राहतो याचा आणि या प्रतिसादाचा संबंध लावणे हा केवळ दिशाभूल -- इतरांची नाही पण स्वतःचीच -- करण्याचा प्रयत्न होईल.)

रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून विदर्भातल्या आत्महत्त्यांपर्यंतचे मुद्दे ऐरणीवर असताना 'स्मारके बांधा, आपल्या जाज्वल्य इतिहासाचे धगधगते स्मरण ठेवा, आपला धर्म आणि संस्कृती सांभाळा' असे ढोल बडवत रहाणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करत रहाण्यातला प्रकार आहे.
विदर्भातील आत्महत्या आणि शिवस्मारकाची हेळसांड हे दोन्हीही महत्वाचे आणि स्वतंत्र विषय आहेत. त्यातही माझ्या मते विदर्भातील आत्महत्या हा अधिक निकडीचा आणि प्राधान्याचा विषय आहे. पण सदर चर्चेत दोन्ही विषयांची सरमिसळ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(अवांतर - विदर्भातील हत्यांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाच्या हेळसांडीच्या विषयाचा पाठपुरावा करायचा नाही हे वादासाठी मान्य केलेच तर मग शहरांतील चित्रपट/गाण्यांचे जलसे, स्वातंत्र्यदिनाची मिरवणूक, क्रिकेटचे सामने हे सारे सारे पहिल्यांदा बासनात गुंडाळून ठेवावे लागेल. )
शिवस्मारकासाठी राखलेला भूखंड विकून आलेले पैसे कोणाचा जीव वाचविण्यासाठी वापरले गेलेले नाहीत.

परदेशस्थ असताना असे राष्ट्रप्रेमाचे उमाळे जरा जास्तच येतात, हे अगदी नैसर्गिक आहे (हे मी स्वानुभवावरून सांगतो). पण कुठेतरी तारतम्यही ठेवले पाहिजे, नाही का? 
हा शेरा विषयाला धरून नाही तर विषय मांडणाऱ्यावर पूर्वग्रहदूषितपणे मते थोपणारा आहे. असो!
(अवांतर - हाच शेरा एखाद्या परदेशस्थ सन्जोप रावांनी मांडला असता तर परदेशात राहून येथील सारा इतिहास विसरलात असा टोला त्याला एखाद्या निर्वासित सन्जोप रावाने जरूर हाणला असता.)
आपण स्वानुभवावरून म्हणता आहात म्हणून आपले हे विधान बिनबुडाचे आहे असे म्हणत नाही. तरीही पुन्हा आपले गृहीतक तपासून पाहावेत.
माझे दोन मुद्दे
(१) स्वानुभवावरून आणि इतरही अनेकांच्या (निर्वासित/अनिर्वासित/परदेशी) अनुभवांवरून सांगतो - परदेशी असणे वा नसणे याचा आणि राष्ट्रभक्तीचा संबंध नाही. तसेच उमाळे येणाऱ्यांच्या बाबतीतही म्हणता येईल.
(२) शिवस्मारकाच्या हेळसांडीचा विषय म्हणजे राष्ट्रप्रेम नाही. तसेच तो राष्ट्रप्रेमाचा केवळ उमाळाही नाही.