जर तुम्ही पाश्चिमात्य देशात संशोधनाचा (विशेषतः औषधांशी संबंधीत) अनुभव घेतला असेल तर होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यांचा वैज्ञानिक पाया किती डळमळीत आहे हे लगेच दिसून येतं.

मला स्वतःला होमिओपॅथीचा उपयोग झाला आहे (असं मला वाटतं). माझे टॉन्सिल्स होमिओपॅथी औषधं घेतल्यावर बरे झाले. पण अशा ऐकीव पुराव्यांवरून शास्त्र चालत नाही. होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यातली कुठली औषधं चांगली आणि कुठली नाही हे ठरवण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स् करायची गरज आहे. जोपर्यंत कोणी त्या करत नाही तोपर्यंत ह्या "शास्त्रां"मध्ये किती तथ्य आहे हे आपण सांगू शकत नाही. याचा अर्थ तथ्य नाही असा नाही, पण आहे असाही नाही. ही "शास्त्रं" म्हणजे विविध प्रमेयांचा संच आहेत. कोणी ही प्रमेयं सिद्ध केलेली नाहीत आणि कोणी खोडून देखिल काढलेली नाहीत.

थोडक्यात ऍलोपॅथीमध्ये औषधे शोधण्याच्या प्रक्रियेतील तर्कशुद्धता बघता मी तरी कुठल्याही गंभीर आजारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद किंवा तसली औषधे घेईन असं वाटत नाही.