आणखी काही मुद्दे -
१) मराठी व हिंदी लिपीत फारसा फरक नसल्यामुळे ती आपल्याला लवकर येते. मला वाटते मराठी माणूस सहजच जर हिंदी बोलत असेल तर ते त्या भाषेच्या साधर्म्यामुळे. पण हिंदी बोलण्या पलीकडे (सहज आणि सोपे म्हणून) हिंदी वृत्तपत्रे , हिंदी साहित्य ह्यात मलातरी कधी कोणी रस घेतलेला दिसला नाही. पेपर वाचायचा झाल्यास मग इंग्रजी पेपर जवळचा वाटतो. संस्कृत विषयाबद्दल बोलणे चाललेले अस्तांना एकदा माझा एक कन्नड मित्र म्हणाला , " तुम्हा लोकांची स्क्रिप्ट एक असल्यामुळे तुम्हाला हिंदी व संस्कृत शिकायला सोपे जाते. तसे शिकणे दाक्षिणात्य लोकांना कठीण आहे. आता विषय निघाला म्हणून विचारतो, देवनागरीशी संबंधीत असलेले किती लोक कोणतीही दाक्षिणात्य भाषेत रस घेतात ?  म्हणजे त्या भागांत असताना अगदी गरज म्हणून जेवढे आवश्यक त्या व्यतिरिक्त ?  बरेच लोकांना तर या चार वेगवेगळ्या भाषा आहेत हे ही कळत नाही. सगळ्याच भाषांना ते तमिळ म्हणतात " तो म्हणाला ते मला पटले.  मी ३०-३२ वर्षे आंध्रात राहूनही काही ती भाषा सर्वार्थाने काही आत्मसात केली नाही. अशा परिस्थितीत परभाषिकांनी इथे आल्यावर सर्व व्यवहार मराठीतच करावेत अशी अपेक्षा करणे ठीक, पण insist करणे किती योग्य हे तपासायला हवे.
२) मराठी भाषिक काय किंवा आणखी कोणी भाषिक काय, ह्याबाबतीत मला एक वाक्य आठवते - बहुतेक Wayne Dier चे असावे - We allow others to treat us the way they treat us. क्लिंटन म्हणतात त्याप्रमाणे आपल्या घरात पाहुणा जर चपला घालून (वा सिगारेट ओढत) हिंडत असेल तर त्या पाहुण्याला आपल्या घरात चपला घालून फिरायची मुभा आपणच दिलेली असते. हा त्याचा दोष नव्हे. असा पाहुणा कोणत्याही स्तराचा असला तरी त्याला तसे न करण्याबद्दल सभ्य भाषेत सूचना करता येते आणि लगेच तो तसे वागतोही.