सर्वसाक्षींनी माहीतीपूर्ण लेख लिहील्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. मृदुलाने विचारल्याप्रमाणे, भगतसिंगांना कम्यूनिझमचे आकर्षण होते. ते, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव सर्वजण "हिंदूस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे" सदस्य होते. एक जयंतीशी नाही पण नंतरचा किस्सा सांगतो. विषयांतर नाही तरी वाटल्यास क्षमस्व.

काही वर्षांपुर्वी क्रांतिकारकांचे लेखक स्व. वसंत पोतदार यांना जवळून भेटायचा आणि त्यांच्याबरोबर काही दिवस राहण्याचा दुर्मिळ योग मला मिळाला. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कित्येक क्रांतिकारकांना भेटून आणि इतर अनेक पुढाऱ्यांना वगैरे भेटून लिखाण केले आहे. (त्यांचे मोठे भाऊ क्रांतिकारक होते) त्यांच्या क्रांतीकारकांच्या पुस्तकात (मला वाटते "कंठस्नान आणि बलीदान") लिहीलेला आणि प्रत्यक्ष सांगितलेला किस्सा त्यांना नमस्कार करून आठवणीप्रमाणे सांगतो (चु,भू. द्या. घ्या.) :

भगतसिंगाचे आई-वडील जेंव्हा त्याला तुरूंगात भेटायला गेले तेंव्हा तो म्हणाला की "मी जरी चाललो असलो तरी माझा भाऊ तुमच्यासाठी मागे ठेवत आहे. तो हे बटूकेश्वरदत्त (खरा मित्र) यांना उद्देशून म्हणत होता. बटूकेश्वरदत्तना तेंव्हा जन्मठेप झाली होती. भगतसिंग हसत हसत फासाव चढला. असे ही म्हणतात की, तुरूंगात सर्व कैदी निषेध करू लागले, आरडा ओऱडा करू लागले, बाहेरही आवरण्यापलीकडे जमाव झाला तेंव्हा पोलीसांनी घाबरून त्या तिघांना आधीच गोळ्या मारल्या आणि मृतदेहांना लांब नेऊन रावी नदीपाशी कसेतरी अर्धे (अपमानस्पद) जाळले...

भारत स्वतंत्र झाला, सर्व राजकीय कैदी मुक्त झाले. बटूकेश्वरदत्तही तुरूंगातून सुटले, पण तब्येतीने खूप खराब होऊन, वित्तहीन अवस्थेत. सरकार सर्व स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देऊ लागले. पण बटूकेश्वरदात्तांनी घेतली नाही कारण जे काही केले ते भारतमातेसाठी विनाअपेक्षा केले तेंव्हा त्याचा मोबदला नको. उत्तरभारतात (मला वाटते) एका शाळेतील शिक्षिकेशी लग्न करून राहीले. तब्येतीची साथ मिळत नव्हती पण काहीही करून भगतसिंगाच्या घरच्यांना भेटायचे होते, भगतसिंगाच्या  समाधीला भेटायचे होते. पण काही माहीती तेंव्हा सहजासहजी मिळणे शक्य नव्हते.

अचानक पडद्यावरच्या सिनेमावर भारतीय समाचार चित्र मधे त्याच्या समाधीपाशी भगतसिंगाची आई दिसली. कशीबशी मानलेल्या आई-मुलाची भेट झाली. खूप आनंद आणी दु:ख मोकळे झाले. मग त्या आईच्या लक्षात आले की याची प्रकृती खालावलेली आहे. उपचाराकरता पैसे नाहीत, कोणाची मदत नाही. फक्त उपेक्षा आहे...

त्याच वेळेस पोतदार त्यांचे कार्यक्रम तिकडे करत होते. मग दोघांनी (भगतसिंगाची आई आणि पोतदार) यांनी रस्त्यावर कार्यक्रम करून पैसे  मिळवले. पुढे बटूकेश्वरदत्तांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भगतसिंगाच्या समाधीपाशी जायचे होते. पण त्या आधी आहेत त्या पैशात उपचार सुरू करायचे ठरवले. पण ते चालू होयच्या आधीच ते गेले. मग त्यांच्या मृतदेहाला भगतसिंगाच्या समाधीपाशी रेल्वेतून नेयची व्यवस्था करण्यात आली. आणि "द ग्रेट इंडीयन मेलोड्रामा" प्रमाणे अनेक सामांन्यांनी आणि तो पर्यंत गप्प असलेल्या त्या काळातील पुढाऱ्यांनी विविध स्थानाकावर अंत्यदर्शन घेऊन पायापाशी पैशाचा डोंगर तयार केला....