अनुप्रिता,
एकदम छान वर्णन केलं आहे तुम्ही प्रसंगाचं. मजा आली वाचून. तुमचं लेकरू खरंच हुशार आहे. आपल्याला हवं ते उत्तर कसं मिळवायचं या दृष्टीने ते विचार करतं आहे. अभ्यासाचा बोजा न वाटता खेळातून त्याला शिकवायचा प्रयत्न केलात तर "चल ना आई.. आता अभ्यास करायचा ना.." असं मागे लागेल तेच तुमच्या.
लहान मुलांना थोडंसं त्यांच्या कलानं घेऊन शिकवलं तर तुम्ही शिकवण्याची लढाई तर जिंकताच पण सोबतच त्यांचं मनही जिंकून त्यांचे कायमचे बेस्ट दोस्त बनता, असं मला वाटतं.
माझ्या भाच्याला अंकमोजणी शिकवायची म्हणता बैठक घालून बसलोय आणि मी त्याच्याकडून एकेक अंक म्हणून घेतेय असं कधी झालंच नाही. नेहमीच दंगाधुडगूस आमचा. मी खुर्चीवर बसायचे आणि त्याचे हात हातात धरून त्याला माझ्या पावलांवर पावलं ठेवून उभं रहायला सांगायचे. तसं तो उभं राहिला की मग मी माझे पाय काटकोनात वरखाली करायचे. नेहमीच्या स्थितीत पाय परत खाली आले की १.. मग परत वर नेऊन खाली आणलं की २.. मग ३.. असं करत करत शेवटी १० पर्यंत मोजणी आली की.. 'आणि...आणि.. आणि.. आणि...' असं मिष्कीलपणे आम्ही एकमेकांना चिडवत शेवटी 'दहाऽऽऽ' म्हणून त्याला पाय वरती नेतानाच एक हलकासा जर्क देत हवेत उडवून मांडीवर बसवून घ्यायचे किंवा कधी जमीनीवर लँड करवायचे. या थिर्लचं त्याला जाम आकर्षण.. हवेत उडवलं गेल्यावर काळजाचा क्षणभर चुकणारा त्याचा ठोका त्याला आवडतच गेला आणि मग एक ते दहा आकडे त्याचे कधी पाठ झाले त्याला कळलंच नाही. '१०' आकडा कधी येतोय त्याची तो नेहमी वाट बघायचा. ते आकडे झाल्यावर त्याने स्वतःहून मग मला अकरा.. बारा म्हणूयात असं म्हटलं होतं. कधी रविवार-सोमवार तर कधी चैत्र-वैशाख.. वगैरे वगैरे बदल व्हायला लागले. धमाल होते ते दिवस.
झोक्यावर बसलो की सुद्धा १-९ आकड्यांपर्यंत नीटपणे झोका देत जायचे त्याला पण १० ला मात्र गोल फिरवून टाकायचे झोका.. गोल फिरवल्याने झोक्याच्या दोरीला पडलेला पीळ सुटताना झोका पटापट गरगर फिरतो. त्यातही त्याला मजा वाटायची. मी ते परतपरत करावं म्हटलं की मग १-१० आकडे म्हणायचा त्याला उत्साह यायचा.
अक्षरे शिकवतानादेखिल नुसतं पाठांतर करून घेण्याऐवजी त्या अक्षरांवरून असलेल्या शब्दांबद्दल गोडी निर्माण करवली तर जास्त फायदा होतो असे वाटते. " 'क' कशाचा रे?" असं विचारता,"अगं आत्या.. 'क' 'कशाचा'.." असं सांगून मोकळा व्हायचा ! मी 'क्वॅक क्वॅक' केलं की तो 'ब' म्हणायचा. त्याला हाक मारली "समीऽऽर" म्हणून की लगेच असेल तिथून धावत येऊन समोर उभा राहून म्हणायचा "'समीर 'स'चा नाहीये काही.. समीर आहे त्याच्या आत्याचा !"
प्रत्येक गोष्टीत त्या मुलांची वैयक्तिक कुठली आवड जोडायचा प्रयत्न करायचा आणि त्याबरहुकुम त्यांना काही सांगायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपोआप मुलांना आपल्याला काहितरी शिकवलं जातं आहे असं वाटत नाही आणि त्यामुळेच त्यांना शिकण्यामध्ये रस उत्पन्न होतो.
लहान मुलांइतका उत्साह इतर कुठल्याच वयाच्या व्यक्तीत सापडणार नाही, त्यामुळे त्यांचा उत्साह फक्त योग्य दिशेने वळवण्यासाठी काय घ्यावे लागतील ते थोडेफार कष्ट घ्यायचे की बस्स.. खरी शिकवणी त्यांचाच उत्साह त्यांना देता होतो मग !